Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !

घुसखोरांना परत पाठवण्यास विरोध करण्यासाठी जमलेले शेकडो बांगलादेशी नागरिक (चौकटीत)

मालदा (बंगाल) – मालदा जिल्ह्याला लागून असलेली भारत-बांगलादेश सीमेवरील सुकदेवपूर भागात २० जूनच्या पहाटे बेकायदेशीरपणे भारतीय सीमेत घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची (पुशबॅक) प्रक्रिया चालू असतांना तणाव निर्माण झाला. या वेळी बांगलादेशी भागात शेकडो नागरिकांची गर्दी जमा झाली. त्यांनी निदर्शने आणि घोषणा दिल्या. यामुळे संपूर्ण भागाचे रणभूमीत रूपांतर झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने अतिरिक्त कुमक मागवली आणि काटेरी तारांजवळ सैनिकांचा बंदोबस्त दुप्पट केला.

१ सहस्र २०० मीटरची उघडी सीमा ठरली डोकेदुखी

सुकदेवपूर येथे १ सहस्र २०० मीटरचा भागामध्ये काटेरी तारांचे कुंपण घातले गेलेले नाही. स्थानिक गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, ही उघडी आणि कुंपण नसलेली सीमा दीर्घकाळापासून देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे. या मार्गावरून वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही याच सीमेचा लाभ घेत बांगलादेशी नागरिक केवळ भारतीय सीमेत घुसले नव्हते, तर त्यांनी भारतीय शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके कापून स्वतःसमवेत नेली होती, ज्यावरून अनेक आठवडे दोन्ही बाजूंमध्ये हिंसक चकमकी झाल्या होत्या. ताज्या घटनेनंतर संपूर्ण सीमावर्ती भागांत अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे.

सुकदेवपूर सीमेवर कुंपण नसणे, हा थेट राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ ! – भाजपचे खासदार खगेन मुर्मू

या घटनेवर भाजपचे खासदार खगेन मुर्मू म्हणाले की, ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. सुकदेवपूर सीमेवर कुंपण नसणे, हा थेट राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. आम्ही वारंवार केंद्र आणि राज्य पातळीवर या १ सहस्र २०० मीटरच्या पट्ट्यात कुंपण घालण्याची मागणी करत आहोत. घुसखोरांचे हे दु:साहस खपवून घेतले जाणार नाही.

सामान्य नागरिकांना स्वतःच्याच घरात असुरक्षित वाटत आहे ! – भाजपचे आमदार राजू कर्मकार

भाजपचे स्थानिक आमदार राजू कर्मकार म्हणाले की, आमच्या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक यांना स्वतःच्याच घरात असुरक्षित वाटत आहे. बेकायदेशीर घुसखोर येतात, गोंधळ घालतात आणि आमच्या लोकांना घाबरवतात. आता जे घडले ते कायदा आणि सुव्यवस्थेला दिलेले थेट आव्हान आहे. आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की, सीमावर्ती गावांना सुरक्षा कवच दिले जावे आणि या संवेदनशील सूत्रावर कायमस्वरूपी तोडगा काढला जावा.

संपादकीय भूमिका

अशा घटना घडणारच आहेत. त्यामुळे अशांना वठणीवर आणण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक असणार आहे !