Bangladeshi Infiltrators Arrest : गौहत्ती (आसाम) येथून १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

भारतात नुकताच केला होता प्रवेश

गौहत्ती (आसाम) – बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवण्याच्या भारताच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे (‘पुश-बॅक’मुळे) सीमा सुरक्षा दल आणि ‘बॉर्डर गार्ड्स बांगलादेश’ यांच्यात तणाव आहे. विशेष करून मेघालय आणि बंगाल राज्यांच्या सीमांवर तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशातच २१ जूनच्या सकाळी आसाम पोलिसांनी येथून १३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांनी भारतात नुकताच प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आर्यनगर येथील एका अतिथीगृहामधून महिला आणि मुले यांच्यासह या १३ जणांना पकडण्यात आले.

दलाल आणि मध्यस्थी यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न

घुसखोरांकडे कागदपत्रे, निवारा आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करून देणारे दलाल अन् मध्यस्थी यांचे जाळे शोधण्याचा आसाम पोलिसांचा सध्या प्राधान्याने प्रयत्न आहे.

कशी मिळाली माहिती ?

१६ जूनला गौहत्ती येथील एल्.जी.बी.आय. विमानतळावर बनावट आधारकार्ड बाळगल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीच्या चौकशीच्या वेळी या १३ बांगलादेशी नागरिकांच्या अस्तित्वाची माहिती समोर आली.

गेल्या काही महिन्यांत प्रशासनाने नव्याने आलेल्या शेकडो बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले आहे, अशी माहिती ‘सेंटिनेल आसाम’ या वृत्तसंकेतस्थळाने दिली. १२ जूनला गौहत्ती रेल्वे स्थानकावरून ९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली, तर ११ एप्रिलला दिसपूर भागातून ४ बांगलादेशींना अटक करून मायदेशी पाठवण्यात आले होते.