श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !

फलाटावरील तुटलेले बाक आणि भटक्या कुत्र्यांचा वावर

तुळजापूर – धाराशिव जिल्ह्यातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री असलेल्या (नवीन) बसस्थानकात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येथील नवीन बसस्थानकात पुढील असुविधा आढळल्या.

१. बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून चोरीच्या घटनांना वाव मिळत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पोलीस चौकी असतांनाही परिसरात पोलीस दिसून येत नाहीत.

पोलीस चौकी असतांनाही परिसरात सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस दिसून आले नाहीत.

२. बसस्थानकातील सूचना आणि सवलती यांचे अनेक फलक फाटलेल्या अवस्थेत आहेत. गाड्यांच्या वेळापत्रकाचे फलक खाली लावण्यात आल्याने प्रवाशांना माहिती नीट दिसत नाही. काही फलक खराब झाले आहेत.

काही फलक खराब झालेल्या अवस्थेतही आढळले.

३. प्रवाशांसाठी बसवण्यात आलेली अनेक बाके तुटली आहेत. फलाटावरील परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर आहेत. देशात भटक्या कुत्र्यांनी लोकांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना बसस्थानकाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

४. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अस्ताव्यस्त लटकले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अस्ताव्यस्त लटकलेल्या असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

५. स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रवाशांसाठी कोणतीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

प्रतिबंधित ठिकाणी उभी केलेली वाहने.
तुळजापूर आगारातील सुविधांच्या संदर्भात प्रशासनाने सांगितले, ‘‘पुणे, संभाजीनगर आणि सोलापूर मार्गावर अतिरिक्त बस फेर्‍या चालू करण्यात आल्या आहेत, तर भाडे भरून वाहनतळाची सुविधाही लवकरच होणार आहे. स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी प्रथमोपचार कक्ष आणि प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बसस्थानकात सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. ‘नाथ जल’च्या पाण्याच्या बाटल्या निर्धारित दरात विक्री करण्यासाठी संबंधितांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.’’