चीनने भारतासमवेत लिपुलेख खिंडीच्या वापराविषयीचा करार कोणत्या आधारावर केला ? : Nepal

  • नेपाळचा चीनला प्रश्न

  • हा तुमच्या दोघांमधील प्रश्न असून चर्चेतून सोडवा ! - चीनचा सल्ला

बीजिंग (चीन) – नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी येथे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. या वेळी खनाल यांनी कालापाणी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेख यांचे सूत्र उपस्थित केले. तसेच भारत आणि चीन यांच्यातील लिपुलेख खिंडीच्या वापराविषयी झालेल्या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, ‘ही व्यवस्था कोणत्या आधारावर सिद्ध करण्यात आली आणि तिचे स्वरूप काय आहे ?’ यावर उत्तर देतांना वांग यी म्हणाले की, हा मूळतः भारत आणि नेपाळ यांच्यातील प्रश्न आहे अन् त्याचे निराकरण चर्चेतूनच होईल. अशा प्रकारची सूत्रे संबंधित देशांनी राजनैतिक चर्चेद्वारे सोडवली पाहिजेत.

भारत आणि चीन यांनी वर्ष २०२० मध्ये लिपुलेख खिंडीमार्गे कैलास मानसरोवर यात्रा आणि सीमापार व्यापार पुन्हा प्रारंभ करण्यावर सहमती दर्शवली होती. यांतर्गत उभय देशांनी हा मार्ग तीर्थयात्रा आणि व्यापार यांसाठी वापरण्यासंदर्भात निश्चित झाले होते. नेपाळने त्या वेळी याला विरोध केला होता. त्याचे म्हणणे होते की, लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा हे त्याच्या क्षेत्राचा भाग आहेत. त्यामुळे त्याच्याशी सल्लामसलत न करता या मार्गाविषयी कोणताही करार स्वीकारला जाऊ शकत नाही. यानंतर नेपाळने भारत आणि चीन या दोन्ही देशांना राजनैतिक विरोध दर्शवला होता.

विशेष म्हणजे, शिशिर खनाल यांनी अलीकडील भारत दौर्‍यात हे सूत्र उपस्थित केले नव्हते. त्या वेळी त्यांनी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्याशी अन्य विषयांवर चर्चा केली होती.

संपादकीय भूमिका

नेपाळला चीनने भीक घातलेली नाही, याचा विचार नेपाळने केला पाहिजे ! यातून स्पष्ट होते की, नेपाळचा या जागेवरील दावा खोटा आहे, हे चीनने मान्य केले आहे !