बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्‍यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury

गायबांधा (बांगलादेश) येथील ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम बंद केल्यावरून बांगलादेशाचे वरिष्ठ संपादक सलाह उद्दीन चौधरी यांचे विधान

सलाह उद्दीन शोएब चौधरी

ढाका (बांगलादेश) – गायबांधामध्ये काय चालले आहे ? इस्लामी कट्टरपंथी आणि जिहादी या प्रकल्पाला लक्ष्य करून त्यांची कुकृत्ये वाढवत आहेत. ते भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्या मूर्ती पाडण्याचे उघड आवाहन करत आहेत आणि सरकारी यंत्रणा मात्र पूर्णपणे गप्प आहे. या देशात हिंदूंना जगण्याचा अधिकार नाही का ? बांगलादेशाला ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्‍या गुन्हेगारांना सरकार साहाय्य करत आहेत का ?, असा संतप्त प्रश्न येथील ‘वीकली ब्लिट्ज’चे वरिष्ठ संपादक आणि अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी लढणारे सलाह उद्दीन शोएब चौधरी यांनी केले. त्यांनी ‘एक्स’वरून स्वत:चा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

चौधरी यांनी उपस्थित केलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. शेकडो मशिदींच्या उभारणीसाठी मुसलमान राष्ट्रांकडून या देशात अब्जावधी डॉलर्स येत आहेत. ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती राष्ट्रे चर्च बांधण्यासाठी पैसे पाठवत आहेत. जपान पॅगोडा (बौद्ध मंदिर) बांधण्यासाठी पैसे पाठवत आहे. यात काहीच अडचण नाही.

२. जेव्हा हिंदू मंदिरे उभारतात आणि मूर्तींची स्थापना करतात, तेव्हाच समस्या निर्माण होते. का ? कारण पाकिस्तानी ‘आय.एस्.आय.’ बांगलादेशातील लोकांच्या मनात हिंदुद्वेष पेरत आहे. एक बांगलादेशी नागरिक म्हणून आम्ही अशी परिस्थिती स्वीकारू शकत नाही. आम्ही हे घडू देऊ शकत नाही.

३. मी मानवाधिकार गट, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, विवेकी नागरिक आणि जगभरातील विविध देशांमधील धोरणकर्ते यांना नम्र विनंती करतो की, त्यांनी यावर आवाज उठवावा अन् बांगलादेश सरकारवर दबाव आणावा.

४. गायबांधा येथील प्रकल्प चालूच राहिला पाहिजे. या प्रकल्पाला धोका निर्माण करणार्‍या इतर अनेक कारस्थानांचीही मला कल्पना आहे. ज्याप्रमाणे चिन्मय कृष्ण दास यांच्या संदर्भात केले, त्याचप्रमाणे खोट्या खटल्यांमध्ये अडकवून या प्रकल्पाच्या आयोजकांना कारागृहात पाठवण्याचा इस्लामी कट्टरपंथींचा मनसुबा आहे. असे घडू दिले जाणार नाही. चिन्मय कृष्ण दास यांचीही त्वरित सुटका झाली पाहिजे आणि गायबांधा येथील प्रकल्पाचे संरक्षण करून तो चालू ठेवला पाहिजे.

५. बांगलादेश सरकारने पाकिस्तानी ‘आय.एस्.आय.’च्या दुष्ट हेतूंसमोर झुकू नये. हा केवळ हिंदूंच्या अधिकारांचा प्रश्न नाही; तर ‘बांगलादेश हे धर्मनिरपेक्षता आणि जातीय सलोखा जपणारे राष्ट्र आहे’, हे सिद्ध करण्याचा हा प्रश्न आहे. आम्हाला आणखी एक पाकिस्तान बनायचे नाही.