वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळा !

  • रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा नाटकाच्या निर्मात्याला आदेश

  • नाटकाचे नाव पालटून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचाही निर्देश !

  • हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या लढ्याला मोठे यश !

‘ईठ्ठला’ या वादग्रस्त नाटकातील दृष्ये

मुंबई/रत्नागिरी – वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठलभक्ती यांची घोर विटंबना करणार्‍या अन् विठ्ठलभक्तांना हिंसक दाखवणार्‍या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती, तसेच वारकरी संप्रदाय यांनी पुकारलेल्या लढ्याला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’ने ८ जून २०२६ या दिवशी अधिकृत पत्र काढून त्यात ‘वारकरी संप्रदायाचा अवमान टाळण्यासाठी या नाटकातील सर्व आक्षेपार्ह भाग, श्री विठ्ठलमूर्ती आणि संतांची नावे तातडीने वगळा’, असे आदेश नाट्य निर्मात्याला दिले आहेत.

१. रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या ‘राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धे’त वीरशैव समाज (लांजा) निर्मित आणि अमोल रेडीज लिखित-दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ नाटक सादर झाले होते. त्यातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’, ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून आणि मुलाची हत्या दाखवत वारकर्‍यांना गुन्हेगार ठरवले होते.

२. हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी यांनी याला आक्षेप घेत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सचिव सं.पुं. खामकर यांनी नाट्य निर्मात्यांना दिलेल्या आदेशात म्हटले की, नाटकातील पात्रांना दिलेली संतांची नावे पालटावीत. नाटकाचे शीर्षक पालटावे. नाटकातील प्रमुख कुटुंब ‘वारकरी’ न दाखवता धार्मिक, साधाभोळा सेवेकरी परिवार दाखवावा. त्यांच्याकडून कुणाचीही हत्या केल्याचे दाखवू नये, म्हणजे विशिष्ट संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. रंगमंचावर प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती आणि त्या अनुषंगाने येणारे वादग्रस्त प्रसंग टाळावेत. ‘कुणाला मारू नये’, असे कुठे लिवलय का विठ्ठलाने ?’ हे संतापजनक वाक्य संहितेतून वगळावे. सुधारित नाट्यसंहिता मान्यतेसाठी सादर करावी.

३. समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेताच त्यांनी तातडीने नोंद घेत निर्मात्यांची कानउघाडणी केली होती.

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाने याची गंभीर नोंद घेऊन आदेश दिल्यासाठी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने नाटकाला मान्यता दिलीच कशी ? – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट

समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हा केवळ एका नाटकाचा विरोध नाही, तर समस्त वारकरी संप्रदाय आणि हिंदू यांच्या जागृत अस्मितेचा मोठा विजय आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आमची आराध्य दैवते, विठुमाऊली आणि पूजनीय संत यांची विटंबना करणारा अघोरी प्रकार आदेशामुळे पूर्णपणे थांबला; मात्र आमचा प्रश्न आहे, ‘चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अशा नाटकाला मान्यता दिलीच कशी ?’ यापुढे केंद्रीय हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणार्‍या नाटकांना मंडळाने अनुमती देऊ नये आणि नियमावली सिद्ध करावी. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणार्‍या प्रवृत्तींना यापुढेही असाच चोख जाब विचारला जाईल.’’