नवी मुंबईत उड्डाणपुलाखाली बकरी आणि मेंढ्या विक्रीची अनुमती रहित !

विश्व हिंदु परिषदेने पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

वाशी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून उड्डाण पुलाखाली बकरी ईदनिमित्त बकरी/मेंढ्या यांच्या विक्रीची अनुमती देण्यात आली होती. त्यामुळे आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरून नागरिकांच्या आरोग्याची हानी होत होती. अनुमती रहित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात विश्व हिंदु परिषदेने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्याची नोंद घेत आयुक्तांनी अनुमती रहित करण्याचे आदेश दिले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई जिल्हा मंत्री स्वरूप पाटील, बजरंग दल नवी मुंबई जिल्हा संयोजक शंकर संगपाळ, सहसंयोजक तेजस पाटील, संदीप सोनटक्के, संतोष कदम, गणेश गुप्ता, निखिल घुडे, कुणाल पवार, अर्जुन सिंह, नरेंद्र पांडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागाने २० ते २८ मे या कालावधीत पुलाखाली आणि अन्य ठिकाणी उघड्या जागेत बकरे/मेंढ्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. सार्वजनिक उपद्रव आणि आरोग्यास बाधक गोष्टी दूर करणे हे आयुक्तांचे वैधानिक कर्तव्य आहे. उघड्यावर मोठ्या संख्येने जनावरे ठेवल्याने मलमूत्र, दुर्गंधी, माश्या, डास यांची पैदास होऊन साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. जनावरांची विक्री आणि बाजार यांसाठी महानगरपालिकेने परवाना दिलेल्या दुकानातील जागा वापरणे बंधनकारक आहे.

कोणत्याही प्राण्याला अनावश्यक वेदना देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण कायद्यानुसार जनावरांचा कचरा आणि मलमूत्र यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उघड्या जागेत यावर नियंत्रण ठेवणे अशक्य असून यामुळे भूजल आणि हवा प्रदूषित होते. हा जल (प्रदूषण) अधिनियमाचा भंग आहे. मोठ्या प्रमाणावर जनावरे एकत्र ठेवल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे ही अनुमती रहित करावी.

संपादकीय भूमिका

यासाठी निवेदन देण्याची वेळ येणे दुर्दैवी !