(म्हणे) ‘हिंदु’ हा धर्म नाही, त्याला अधिकृत मान्यता नाही !’ – कर्नाटकातील बेंगळुरू धर्मपिठाचे मठाधिपती

  • लिंगायत समाजाच्या बेंगळुरू धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांचे विधान

  • लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ ‘लिंगायत’ म्हणून नोंद करण्याचे केले आवाहन !

  • नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांचा तीव्र आक्षेप !

कर्नाटकातील बेंगळुरू धर्मपिठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी

सोलापूर – हिंदु हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे होत असलेल्या जनगणनेमध्ये ‘धर्मा’च्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे, असे विधान कर्नाटकातील बेंगळुरू धर्मपिठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांनी केले. या विधानावर नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘हिंदु हा केवळ धर्म नसून ती राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख आहे. सनातन वैदिक संस्कृतीसह बौद्ध, जैन आणि शीख हे सर्व याच व्यापक व्याख्येत येतात. ज्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी ही भारत आहे, ते सर्वच हिंदु आहेत.’’

जनबसवनंद स्वामी यांनी मांडलेली सूत्रे

१. भारतात सध्या अधिकृतपणे जैन, बौद्ध आणि शीख या ३ भारतीय समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता आहे.

२. ब्रिटीश राजवटीमध्ये ‘लिंगायत समाजा’ला स्वतंत्र धार्मिक मान्यता होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मान्यता मोडित निघाली.

३. ‘लिंगायत धर्मा’ला सार्वजनिक आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी आगामी जनगणनेचा उपयोग करणे आवश्यक आहे.

४. यासाठी २ जून २०२६ पासून सोलापूरच्या मंगळवेढा येथून थेट मुंबईपर्यंत ‘भव्य लिंगायत धर्म जागृती यात्रा’ काढण्यात येणार आहे.

भारताचे धार्मिक ऐक्य धोक्यात येईल ! – महंत सुधीरदास

महंत श्री सुधीरदासजी महाराज

लिंगायत समाज हा हिंदु धर्म आणि सनातनी विचार याद्वारेच पूजा करतो. अशा प्रकारे प्रत्येक संप्रदायाने स्वतंत्र धर्माची मागणी केल्यास भारताचे धार्मिक ऐक्य धोक्यात येईल. समाजात दुफळी निर्माण होईल.

जनबसवनंद स्वामी यांनी ‘हिंदु धर्माची व्याख्या नीट समजून घेऊन स्वत:चे विधान मागे घ्यावे’, असे आवाहन महंत सुधीरदास यांनी केले.

संपादकीय भूमिका

  • लिंगायत समाजाच्या अन्य मठाधिपतींना हे मान्य आहे का ? ते या विधानाचा विरोध करणार आहेत का ? लिंगायत समाजातील लोक याचा विरोध करणार आहेत का ? असे प्रश्‍न उपस्थित होतात !
  • हिंदु धर्म हीच भारताची ओळख आहे. सर्व प्राचीन धर्मग्रंथ सनातन हिंदु धर्माचीच महती सांगतात. असे असतांना धर्माचार्यांनी अशी विधाने केल्यामुळे हिंदूंमध्ये फूट पडणार नाही का ?