महागाव (जिल्हा यवतमाळ) येथे गोतस्करांच्या आक्रमणात गोरक्षकाचा मृत्यू !

दगड आणि लाकडी दांडके यांनी केले आक्रमण

गोरक्षक गजानन सुरोशे

महागाव (यवतमाळ जिल्हा) – येथील बिजोरा पथकर नाक्याजवळ गोवंश तस्करांनी गोरक्षक गजानन सुरोशे यांच्यावर दगड आणि लाकडी दांडके यांनी जीवघेणे आक्रमण केले. त्यात सुरोशे यांचा मृत्यू झाला. येथील सीसीटीव्हीत हा प्रकार चित्रीत झाला आहे.

१. रात्री बजरंग दलाचे काही कार्यकर्ते पथकर नाक्यावर उभे होते. एका पिकअप वाहनात ८ ते १० गोवंशीय असल्याची शंका आल्याने कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहनाने धक्का देत कार्यकर्त्यांच्या दुचाकीला पाडले. यात दोघे जण घायाळ झाले.

२. या वेळी गोरक्षक गजानन सुरोशे वाहनाने जात होते. त्यांनी पिकअपचा पाठलाग केला. तेव्हा गोतस्करांनी त्यांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. लाकडी दांडके आणि काठ्या यांनी आक्रमण केले. यात त्यांचा मृत्यू झाला. गोतस्करांनी गोवंशियांना तेथेच सोडून पळ काढला.

३. बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात गर्दी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. (अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय ! गोप्रेमींच्या महाराष्ट्रात आणखी किती गोरक्षकांच्या हत्या होऊ दिल्या जाणार आहेत ? राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे, हे हिंदूंना आणि गोरक्षकांना अपेक्षित नाही !
  • गोरक्षकाची हत्या करणार्‍या गोतस्करांना फाशीची शिक्षा होण्यासाठी तरी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !