गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, देशभरात गायींच्या हत्येवर बंदी घाला !

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आरक्षण मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी महंमद परवेझ सिद्दीकी यांची पंतप्रधान मोदी अन् सर्व मुख्यमंत्री यांना पत्र लिहून मागणी

हाजी महंमद परवेझ सिद्दीकी

मुझफ्फरपूर (बिहार) – राष्ट्रीय अल्पसंख्यांक आरक्षण मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इस्लामी विचारवंत हाजी महंमद परवेझ सिद्दीकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची, तसेच देशभरात गोहत्या अन् गायीचा बळी देण्यावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गाय भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा आधार

हाजी महंमद परवेझ सिद्दीकी म्हणाले, ‘गाय केवळ धार्मिक आस्थेचे प्रतीक नसून भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण यांचे जिवंत प्रतीक आहे. कोट्यवधी लोकांच्या भावना गायीशी जोडलेल्या आहेत आणि गोसंरक्षण हा भारतीय समाजाच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडित विषय आहे.’ पत्रात त्यांनी भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख करत कलम ४८ चा हवाला दिला आहे, ज्यामध्ये गोवंश संरक्षणाविषयी भाष्य करण्यात आले आहे.

ही मागणी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही !

सिद्दीकी यांनी स्पष्ट केले की, त्यांची गोहत्या बंदीची ही मागणी कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही. (किती मुसलमान नेते सिद्दीकी यांच्या वक्तव्याचे जाहीर समर्थन करणार आहेत ? – संपादक) भारतातील मुसलमान समाज नेहमीच शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदर यांचा समर्थक राहिला आहे. माझा उद्देश सामाजिक सौहार्द, प्राण्यांचे संरक्षण आणि राष्ट्रीय एकता भक्कम करणे हा आहे. संवेदनशील सूत्रांवर संघर्ष नको, तर संवाद आणि संतुलन यांची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या !

१. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यावर गांभीर्याने विचार करण्यात यावा.

२. राष्ट्रीय स्तरावर गोसंरक्षण आयोग स्थापन करावा.

३. सर्व धर्म आणि समुदाय यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून राष्ट्रीय सहमती निर्माण करावी.

संपादकीय भूमिका

  • हे सरकारांना सांगावे का लागते ?
  • हे विधान एका राष्ट्रीय मुसलमान संघटनेच्या अध्यक्षाने केल्याने मुसलमानांचे लांगूलचालन करणारे हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी काँग्रेसशासित सरकारे स्वत:च्या राज्यात यावर कार्यवाही करतील का ?