West Bengal Assembly Election Results : बंगालमध्ये मुसलमानप्रेमी ममताराज समाप्त !

  • देशातील ५ पैकी ३ राज्यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय !

  • आसाम आणि पुद्दीचेरी येथे पुन्हा भाजपची सत्ता

  • केरळमध्ये साम्यवाद्यांचा, तर तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचा पराभव

  • तमिळनाडूत अभिनेते जोसेफ विजय यांच्या टी.व्ही.के. पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत

  • केरळमध्ये काँग्रेसला बहुमत

नवी देहली – देशातील आसाम, बंगाल, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळम् या ५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ मे या दिवशी लागला. यात आसाम आणि पुद्दुचेरी येथे भाजपने सत्ता कायम राखली, तर बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेवर असणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करून प्रथमच सत्ता प्राप्त केली.

तमिळनाडूमध्ये एम्.के. स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक –  द्रविड प्रगती संघ) पक्षाचा पराभव करत अभिनेते जोसेफ विजय यांच्या टीव्हीके (तमिलगा वेट्री कळघम् – तमिळनाडू विजय महासंघ) या पक्षाने त्याच्या पहिल्याच निवडणुकीत बहुमत प्राप्त केले आहे. केरळम्मध्ये साम्यवाद्यांच्या ‘लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट’चा (एल्.डी.एफ्. – डाव्या लोकशाही आघाडीचा) पराभव करत काँग्रेसच्या ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ला (यू.डी.एफ्. – संयुक्त लोकशाही आघाडीला) बहुमत मिळाले आहे. साम्यवाद्यांच्या या पराभवामुळे प्रथमच साम्यवाद्यांची देशात सत्ता कुठेच नसल्याचे घटना घडली.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव होणारच होता ! – बाबरी मशीद बांधण्याचा प्रयत्न करणारे हुमायू कबीर यांचे विधान

हुमायू कबीर

‘आम जनता उन्नयन पार्टी’चे संस्थापक हुमायू कबीर यांनी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला नाकारल्यासाठी बंगालच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर राज्याची लूट केल्याचा आरोप केला. पत्रकारांशी बोलतांना हुमायू कबीर म्हणाले की, जे झाले ते चांगले झाले. हे तर होणारच होते. ममता बॅनर्जी तीनदा मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी त्यांच्या पुतण्याला अमर्याद अधिकार दिले. त्यांनी जनतेची फसवणूक केली आणि पैसे लुटले. १५ वर्षांत त्यांनी ती लूटही मागे टाकली, जी ब्रिटिशांनी १०० ते २०० वर्षांत केली होती.

मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद बांधण्याच्या प्रकरणावरून हुमायू कबीर यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. ते निवडणुकीत रेजीनगर आणि नौदा या दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत. कबीर यांनी विश्वास व्यक्त केला की, ते दोन्ही जागा जिंकतील.

आसनसोलमध्ये (बंगाल) तृणूमल काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड !

आमनसोल भागातील तृणमूल काँग्रेस कार्यालयात तोडफोड झाली आहे. कार्यालयाजवळच्या गाड्या, आसंद्या (खुर्च्या) यांच्यासह अनेक वस्तूंची तोडफोड करण्यात आली. भाजप आणि तृणमूल यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घायाळ झाले आहेत.

आसामचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई पराभूत !

गौरव गोगोई

आसामच्या जोरहाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गौरव गोगोई काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार आहेत. या जागेवर भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी २० सहस्रांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

तमिळनाडूत हिंदुद्वेषी मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन पराभवाच्या छायेत !

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुकला जनतेने पूर्णच नाकारले आहे. द्रमुक सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन मतमोजणीत पिछाडीवर आहेत, तर त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हेही प्रारंभीच्या टप्प्यात पिछाडीवर होते. नंतर त्यांनी किरकोळ आघाडी घेतली होती. तसेच द्रमुक सरकारमधील ३४ पैकी ३१ मंत्रीही पिछाडीवर आहेत. वर्ष २०२३ मध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांशी केली होती. जेव्हा वाद वाढला, तेव्हा मुख्यमंत्री एम् के. स्टॅलिन यांनी समोर येऊन आपल्या मुलाची उघडपणे पाठराखण केली होती.

संपादकीय भूमिका

बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा हिंदूंनी केलेला पराभव ही देशाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी घटना आहे. या विजयामुळे बंगालमधील हिंदूंचे, तसेच देशाचे रक्षण होईल !