‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न ! – कॅप्टन आशिष दामले

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चा ‘ब्राह्मण शेतकरी मेळावा’ उत्साहात पार पडला !

ब्राह्मण शेतकरी मेळाव्या’त पुरस्कारप्राप्त शेतकरी महिलांसह मान्यवर

कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न आहेत. संस्कार आणि संस्कृती जतन करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या पौरोहित्य करणार्‍या समाजबांधवांसाठी शिष्यवृत्ती मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. यापुढील काळात महिलांसाठी ‘रमाबाई रानडे’ यांच्या नावाने २० लाख रुपयांपर्यंत बिनव्याज कर्ज देण्याचा प्रस्ताव असून शेतकरी समाज बांधवांसाठी महामंडळ प्रयत्न करील, अशी ग्वाही ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिली. ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने येथे ‘ब्राह्मण शेतकरी मेळावा’ पार पडला.

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या मेळाव्यात कयपंजीने दीपप्रज्वलन करतांना ‘चितळे उद्योगसमुहा’चे संचालक गिरीश चितळे, तसेच मान्यवर

या प्रसंगी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, ‘चितळे उद्योगसमुहा’चे संचालक गिरीश चितळे, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामराव जोशी, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विवेक जोशी यासंह समाजबांधव उपस्थित होते.

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या मेळाव्यात गोमातेला गोग्रास भरवतांना मान्यवर

या प्रसंगी श्री. गिरीश चितळे म्हणाले, ‘‘यापुढे शेतीमध्ये आधुनिक व्यवस्थापन आणावे लागेल. रसायनमुक्त शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पादनाचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’’ श्री. गोविंदराव कुलकर्णी म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाजाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे. ब्राह्मणत्वाचे पालन केल्यास त्यांना काहीच अवघड नाही.’’ या मेळाव्यात हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी ‘पालटते हवामान’ या विषयावर मार्गदर्शन केले.


क्षणचित्रे

१. मेळाव्यापूर्वी गोमातेचे पूजन करून गोग्रास भरवण्यात आला.

२. परशुरामांच्या प्रतिमेचे कयपंजीने दीपप्रज्वलन करण्यात आले.

या निमित्ताने सातारा येथील सौ. सुनीती धायगुडे, मलकापूर येथील सौ. हेमांगी देशपांडे, ईश्वरपूर येथील सौ. वरदा हसबनीस यांसह १० महिला शेतकर्‍यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, तर गिरीश चितळे यांना ‘सहकारभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.