सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

  • धर्म आणि अध्यात्म क्षेत्रांतील अतुलनीय योगदानासाठी करण्यात आले सन्मानित !

  • हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी स्वीकारला सन्मान !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना सन्मानचिन्ह प्रदान करतांना विश्व ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल, सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉ. एच्.एस्. रावत, विश्व ज्योतिष महासंघाचे सभापती आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा

पाटलीपुत्र (बिहार), ७ एप्रिल (वार्ता.) – येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत  आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना धर्म अन् अध्यात्म क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘धर्म अलंकार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांतर्गत सन्मानचिन्ह, माँ पटन देवी सन्मान पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

या संमेलनाचे आयोजन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’, ‘साऊथ एशियन एस्ट्रो फेडरेशन’ आणि ‘एस्ट्रो, वास्तु अँड वैदिक सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात बिहारचे ग्रामीण कार्य विभाग मंत्री श्री. अशोक चौधरी, नेपाळचे राजगुरु श्री. माधव भट्टाराय, तसेच बंगालचे कला, संस्कृती दूत श्री. अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मानचिन्ह ,पदक व प्रमाणपत्र

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून संशोधन सादर !

या संमेलनामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा यांच्या वतीने विविध संशोधन सादर करण्यात आले. यांत वास्तूमध्ये नामजप केल्याने होणारे सकारात्मक परिणाम, अयोध्या येथील श्रीराममंदिर, भारतीय गोमाता, भारतीय शास्त्रीय संगीत इत्यादी विविध विषयांवर आणि ‘ऑरा’(प्रभावळ) तसेच ‘एनर्जी स्कॅनर्स’च्या माध्यमातून केलेले संशोधनकार्य सादर करण्यात आले. यामुळे सनातन धर्माची वैज्ञानिकता सिद्ध झाली, तसेच ‘त्याचे पालन केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा कशी वाढते ?’, हे सर्वांना स्पष्ट झाले.

वर्ष १९९८ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारत विश्वगुरु बनण्याची केलेली भविष्यवाणी !

संशोधन सादर करतांना डावीकडे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि व्यासपिठावर उपस्थित संत अन् मान्यवर

या संमेलनात हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘भारतभूमीची आध्यात्मिक शुद्धता, तिच्या आध्यात्मिक आणि सांसारिक प्रगतीचे प्रमाण कसे आहे ?’, या विषयावर संशोधन सादर केले. त्यांनी सांगितले की, वर्ष १९९८ मध्येच विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भविष्यवाणी केली होती की, ‘भारत अशा राष्ट्राच्या रूपात उदयास येईल, जिथे सनातन धर्म केंद्रस्थानी असेल आणि तो विश्वगुरुचे स्थान प्राप्त करेल.’