श्रीरामनवमी दिवशी शेकडो हिंदुत्वनिष्ठांनी केला रामराज्य स्थापनेचा संकल्प !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु एकता शोभायात्रे’चे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरात फडकलेला धर्मध्वज हा ५०० वर्षांच्या संघर्षाचा विजयध्वज आहे. भारतातील प्रत्येक हिंदूच्या हृदयात तो फडकवून हिंदूंचे संघटन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ आयोजित केली होती. या शोभायात्रेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ते, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि अनेक श्रीरामभक्त सहभागी झाले होते. यात्रेच्या समारोपप्रसंगी सर्व संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ‘जगाच्या कल्याणासाठी भारतात रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन व्हावे’, अशी प्रभु श्रीरामाच्या चरणी सामूहिक प्रार्थना केली आणि रामराज्यासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

या शोभायात्रेला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी ‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा, सरचिटणीस श्री. कविंद्र जैस्वाल, ‘अन्नपूर्णा उद्योग समुहा’चे श्री. रवी झुनझुनवाला, ‘गुजराती समाजा’चे अध्यक्ष श्री. अनिल शास्त्री, ‘अखिल भारतीय मानस प्रचार समिती’चे अध्यक्ष श्री. रविशंकर सिंह, ‘टाऊन हॉल व्यापार मंडळा’चे अध्यक्ष श्री. सुजीत शर्मा, ‘शीतलमाता मंदिरा’चे महंत अभिषेक पांडे, ‘जालान परिवारा’च्या निधी जालान, ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’चे डॉ. अजय जैस्वाल, ‘स्वर्णकार समाज संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. सत्यनारायण सोनी, ‘पहल फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुबोधचंद्र राय, माजी प्रधान श्री. जयप्रकाश सिंह, सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजपूजन आणि शंखनाद यांनी शोभायात्रेला प्रारंभ झाला. सर्वांनी प्रभु श्रीराम आणि पवनपुत्र हनुमान यांचा जयघोष करत वातावरण चैतन्यमय झाले. या वेळी अनेक रामभक्तांनी उत्साहाने शोभायात्रेत सहभाग घेतला आणि प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव केला. काशीविश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक ४ येथे ध्वनीक्षेपकावर लावण्यात आलेल्या प्रभु श्रीराम रचित शिवस्तुतीने वातावरण भक्तीमय झाले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान १ घंटा समर्पित करा ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

हिंदु धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे तत्त्व शिकवतो. अशा धर्माला अधिकृत घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. ही मागणी जगाच्या कल्याणासाठी आणि हिंदु संस्कृतीचे जतन करण्यासाठी आवश्यक आहे. ज्याप्रमाणे खारीने रामसेतू उभारण्यात योगदान दिले, त्याचप्रमाणे सर्व रामभक्तांनी प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा नामजप करून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी किमान १ घंटा समर्पित करावा.