भारतियांचे प्राण घेण्यासाठी पैसा वापरला जाऊ शकतो ! – Sunil Gavaskar

इंग्लंडमधील स्पर्धेसाठी पाक खेळाडूला खरेदी केल्यामुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची काव्या मारन यांच्या संघावर टीका

डावीकडून काव्या मारन आणि सुनील गावस्कर

मुंबई – इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडू लिलावात ‘सनरायझर्स लीड्स’ संघाने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याला २ कोटी ३४ लाख रुपयांना  विकत घेतले. सनरायझर्स लीड्स या संघाचे मालकी हक्क ‘सन ग्रुप’कडे आहेत. हाच समूह इंडियन प्रिमिअर लिग (आय.पी.एल्.) या भारतातील क्रिकेट स्पर्धेतील ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघाचाही मालक असल्याने या निर्णयावर तीव्र टीका होत आहे. ‘सनरायझर्स हैदराबाद’च्या मालकीण काव्या मारन आहेत. ‘भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय का घेतला ?’, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही यावर टीका केली आहे. गावस्कर यांनी त्यांच्या लेखात नमूद केले की, भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूला दिलेला पैसा कराच्या स्वरूपात पाकिस्तान सरकारकडे जाऊ शकतो आणि त्याचा वापर शस्त्रास्त्र खरेदीसाठी होऊ शकतो. त्यामुळे अशा पैशांचा वापर अप्रत्यक्षपणे भारतियांविरुद्ध होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आतंकवादी आक्रमणांमुळे भारतीय जनतेच्या भावना अधिक संवेदनशील आहेत !

गावस्कर यांनी पुढे लिहिले आहे की, भारत-पाकिस्तान संबंधांतील मागील काही वर्षांतील घटनांचा विचार करता लोकांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. वर्ष २००८ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आय.पी.एल्.मध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यानंतर वर्ष २०१९ मधील पुलवामा येथील आक्रमण आणि वर्ष २०२५ मधील पहलगाम येथील आक्रमण यांसारख्या घटनांमुळे भारतीय जनतेच्या भावना अधिक संवेदनशील झाल्या आहेत.

स्पर्धेत विजय मिळवणे भारतीय जिवांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे का ?

‘सनरायझर्स लीड्स’चे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांना कदाचित् या संवेदनशीलतेची जाणीव नसावी; परंतु भारतीय मालकांनी परिस्थितीचा विचार करायला हवा होता, असे गावस्कर यांनी लिहिले. भारतीय मालक अप्रत्यक्षपणे अशा व्यवस्थेला निधी देत आहेत ,ज्यामुळे भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. जगातील फार थोड्या देशांचे खेळाडू सहभागी होणार्‍या स्पर्धेत विजय मिळवणे भारतीय जिवांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे का ?, असा प्रश्न गावस्कर यांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

भारतीय मालक असलेल्या संघाने पाकिस्तानी खेळाडूला खरेदी करून कोट्यवधी नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अशा पाकप्रेमींवर सरकारने कारवाई करणे आवश्यक !