‘भारतात सर्व जातीच्या लोकांना शिक्षण दिले जात होते’, याचा इंग्रजांनीच दिलेला पुरावा !

‘भारतात इंग्रज येण्यापूर्वी शिक्षणाची स्थिती दयनीय होती’, या अपप्रचाराचे खंडण

‘भारतात तथाकथित शूद्र वर्णास शिक्षण दिले जात होते’, याचे भक्कम पुरावे ‘सर्व्हे ऑफ इंडिजिनीयस एज्युकेशन इन द प्रोव्हिनन्स ऑफ बाँबे १८२०-१८३०’ या सर्वेक्षणात मिळतात. हे सर्वेक्षण इंग्रजांनी केलेले आहे. ‘वर्ष १८२० मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी लिहितात,

अ. ‘जर एखाद्या गावात ‘पंतोजी’ (शिक्षक) असतील, तर शेजारच्या सर्व गावांतील सधन कुळ (शेतकरी) त्यांच्या उपस्थितीचा लाभ घेतात आणि ते त्यांची मुले किंवा कुटुंबातील किमान एका मुलाला तरी पंतोजींकडे वाचन, लेखन अन् अंकगणित शिकण्यासाठी पाठवतात.’

आ. ‘पालकांच्या शिकण्याच्या इच्छेविषयी बोलायचे झाले, तर ते त्यांच्या हुशार मुलांना शिकवण्यासाठी किती उत्सुक असतात, हे पाहून आश्चर्य वाटते. माझ्या ओळखीच्या अनेक श्रीमंत कुणबी व्यक्तींच्या दातृत्वाचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांनी स्वतःच्या खर्चाने पंतोजींना आपल्या गावात रहाण्यासाठी पाचारण केले, त्यांना ठराविक मासिक वेतन दिले आणि स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासह गावातील इतर मुलांनाही नेहमीच्या मासिक शुल्कावर शिकवण्याची सवलत दिली.’

इ. तत्कालीन विद्यार्थ्यांमध्ये कुणबी किंवा मोठ्या शेतकरी वर्गाचे प्रतिनिधीत्व अजिबात अल्प नव्हते. त्यांच्या निवासस्थानाजवळ अशी क्वचितच एखादी शाळा असेल, जिथे कुणबी मुले जात नसत. वस्तूतः ज्या दोन ठिकाणची कुणबी मुलांची आकडेवारी उपलब्ध आहे, ती संख्या अल्प नाही. अहमदाबाद (कर्णावती) जिल्ह्याची आकडेवारी दर्शवते की, जिल्ह्यातील २ सहस्र ९७३ विद्यार्थ्यांपैकी ५२४ ‘कुणबी’ होते, तसेच दक्षिण कोकण जिल्ह्याच्या १ सहस्र ८२९ च्या न्यायाधीशांच्या अहवालानुसार शाळांमधील ६ सहस्र ७२१ विद्यार्थ्यांपैकी १ सहस्र ७२९ विद्यार्थ्यांसह कुणबी समाज दुसर्‍या क्रमांकावर होता.

ई. खानदेशाच्या कोष्टकांमध्ये विविध जातींच्या विद्यार्थ्यांची एक मोठी सूची दिली आहे; परंतु त्यात ‘कुणबी’ या जातीचा उल्लेख नसून ‘शूद्र’ अशी एक जात दर्शवली आहे, जी बहुधा शेतकरी वर्गाचेच निदर्शक असावी. एकूण २ सहस्र २२ विद्यार्थ्यांपैकी या वर्गातील मुलांची संख्या ३५७ दर्शवण्यात आली आहे. येथेही ही संख्या दुसर्‍या क्रमांकावर असून ४८६ विद्यार्थ्यांसह ब्राह्मण समाज प्रथम क्रमांकावर आहे. ‘५ सहस्र वर्षे शिकू दिले नाही’, असे सांगणार्‍या या देशात इंग्रज येण्याच्या आधीही भारतात शिक्षणाची उत्तम परिस्थिति होती, हे समजते.

– शंतनू परांजपे, सनदी लेखापाल, पुणे.

संपादकीय भूमिका

‘भारतात मागासवर्गियांना शिक्षण दिले जात नव्हते’, असे म्हणणार्‍या पुरोगाम्यांना इंग्रजांनी प्रसिद्ध केलेला अहवाल चपराक होय !