भारत पुन्हा पाकविरोधात युद्धाची सिद्धता करत आहे ! – Asif Ali Zardari

  • पाकचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा संसदेत दावा

  • चर्चेसाठी भारताला केले आवाहन

पाकचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतीय नेते पाकच्या विरोधात आणखी एका युद्धाची सिद्धता करत आहेत. भारताने रणांगणातून मागे हटून चर्चेच्या मार्गावर यावे; कारण प्रादेशिक सुरक्षेसाठी तोच एकमेव पर्याय आहे, असे आवाहन पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकच्या संसदेत केले. झरदारी यांनी पाकिस्तानला उत्तरदायी अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. ‘अशा शक्तीसमवेत मोठे दायित्व येते; मात्र आवश्यकता भासल्यास पाकिस्तान स्वतःचे संरक्षण करू शकतो’, असेही स्पष्ट केले. (स्वत: ‘उत्तरदायी’ आहे, असे ठरवणे हास्यास्पद होय. अन्य राष्ट्रांनी तसे म्हटले पाहिजे, ही साधी गोष्टही पाकच्या प्रथम नागरिकाला कळत नाही. यातून या देशाचीच बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते ! – संपादक)

(म्हणे) ‘सिंधु जल वाटप करार रहित करणे हा जल आतंकवाद !’

राष्ट्रपती झरदारी यांनी सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर कठोर टीका केली. त्यांनी त्याला ‘जल आतंकवाद’ असे संबोधले आणि नवी देहली राजकीय लाभासाठी पाण्याचा प्रवाह शस्त्राप्रमाणे वापरत असल्याचा आरोप केला. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना राजनैतिक अन् नैतिक पाठिंबा देत राहू. काश्मीर प्रश्‍न निकाली निघाल्याखेरीज दक्षिण आशियात शांतता शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले. (‘जिहादी आतंकवाद’ आणि ‘हिंदुद्वेष’ या विचारसरणीवर उभारलेल्या पाकला भारताची पाकला धडा शिकवणारी कोणतीही कृती आतंकवादासमच वाटणार ! – संपादक)

तालिबानवर आरोप, संसदेत गदारोळ

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर बोलतांना झरदारी यांनी दोहा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप तालिबान प्रशासनावर केला. ‘पाकिस्तानची भूमी पवित्र असून ती अस्थिर करण्याची अनुमती दिली जाणार नाही’, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या भाषणाच्या वेळी इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी खान यांच्या सुटकेची मागणी करत घोषणाबाजी केली आणि सभागृहात गदारोळ झाला.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत पाकिस्तानने भारतावर केलेल्या आक्रमणामुळे ४ युद्धे झाली आहेत. भारताने कधीही पाकवर आक्रमण केले नाही. असे असतांना अशा प्रकारचा आरोप करून स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न झरदारी करत आहेत. भारताने खरेच युद्ध केले, तर जगाच्या नकाशावरून पाक नष्ट होणार असल्याने ते आता चर्चेची गोष्ट करत आहेत !