Muzaffarnagar Riots : १३ वर्षांनंतर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीच्या प्रकरणात ३७ हिंदूंची निर्दाेष मुक्तता

मुझफ्फरनगर दंगल (संग्रहित छायाचित्र)

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात वर्ष २०१३ मधील हिंदू-मुसलमान दंगलीतील एका महत्त्वाच्या प्रकरणात अंततः हिंदु कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने कुटबा गावाशी संबंधित प्रकरणात ३७ हिंदु आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. यांतील ८ आरोपींचा मृत्यू झाला आहे. आरोपी गेली १३ वर्षे कारागृहात होते. समाजवादी पक्षाच्या तत्कालीन अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात या निरपराधी हिंदूंवर खोटे गुन्हे नोंदवण्यात आल्याचा आरोप होता. तसेच या दंगलीत केवळ मुसलमानांना हानीभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पक्षपाती भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानेही अप्रसन्नता व्यक्त केली होती. आताच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यकाळात या हिंदु कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

सरकारी पक्ष आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर करू शकला नाही, साक्षीदारांचे जबाब पालटले आणि साक्ष दुर्बल होती, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे ३७ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.

कुटबा येथे ८ मुसलमानांचा झाला होता मृत्यू

८ सप्टेंबर २०१३ या दिवशी कुटबा गावात हिंसाचार झाला. यात इम्रान याने केलेल्या तक्रारीत शेकडो लोकांच्या जमावाने धार्मिक घोषणा देत मुसलमानांच्या घरांवर आक्रमण केल्याचे म्हटले होते. यात रायफल, देशी पिस्तूल, तलवारी आणि धारदार शस्त्रे यांद्वारे झालेल्या आक्रमणात घरे जाळण्यात आली, लूटमार झाली आणि ८ मुसलमानांचा  मृत्यू झाला. या प्रकरणी ११० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला, तर ३७ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.

मुझफ्फरनगर दंगलीचा इतिहास

२७ ऑगस्ट या दिवशी कवाल गावात जाट समाजातील मुलीची छेड काढल्याच्या आरोपानंतर सचिन आणि गौरव या दोन भावांची हत्या झाली. त्यानंतर मुसलमान युवक शाहनवाज याची हत्या झाली. ७ सप्टेंबर या दिवशी जाट महापंचायत झाली आणि ८ सप्टेंबरपासून हिंसाचार पसरला. एकूण ६२ जणांचा मृत्यू झाला, त्यात ४२ मुसलमान आणि २० हिंदू होते. ५० सहस्रांहून अधिक लोक विस्थापित झाले. त्यांपैकी बहुसंख्य मुसलमान कुटुंबे साहाय्य शिबिरांत गेली.

संपादकीय भूमिका

विलंबाने मिळणार न्याय हा अन्यायच होय ! अशा प्रकरणात संबंधितांना हानीभरपाई मिळण्यासह अन्वेषण यंत्रणांना दंड ठोठावण्याचा कायदा करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे !