Sheikh Hasina : बांगलादेशात परतण्याची शेख हसीना यांची घोषणा !

शेख हसीना

नवी देहली – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वत:चे प्राण वाचवत ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी भारत गाठले होते. तेव्हापासून त्या भारतातच वास्तव्य करून आहेत. तथापि आता त्या पुन्हा मायदेशी परतणार असल्याची त्यांनी स्वत: घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशातील निवडणुकांवर त्यांनी कठोर टीका करत त्यांच्या ‘अवामी लीग’ पक्षावर झालेल्या अन्यायाविषयीही वाचा फोडली. ढाका येथे अवामी लीग पक्षाच्या काही नेत्यांच्या बैठकीत हसीना देहलीतून ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.

आपल्या मातृभूमीत परतलेच पाहिजे ! – शेख हसीना

हसीना यांनी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केले की, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सिद्ध व्हा. आता सर्वांना आपल्या मातृभूमीत परत जाऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. सामान आवरा, देशात परतून मैदानात उतरायची वेळ आली आहे.

हसीना यांनी महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारला, तसेच तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारला थेट आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, युनूस सरकारच अवैध होते. त्यामुळे त्यांच्या आदेशांना अर्थ नव्हता. जर सरकारने अवामी लीगवरील बंदी उठवली नाही, तर पक्ष स्वतःची रणनीती ठरवेल आणि कठोर पावले उचलेल, असा इशाराही त्यांनी दिला.

हसीना यांनी बांगलादेशात झालेल्या निवडणुकीला विनोद ठरवत ‘जनतेने मतदानावर बहिष्कार टाकला’, असा दावाही केला. ६० टक्के मतदानाचा आकडा पूर्णतः खोटा होता; कारण मतदानापूर्वीच मतपेट्या भरल्या गेल्या, असा आरोपही हसीना यांनी केला.

विशेष म्हणजे सध्या अवामी लीग पक्षावर बंदी असून हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.