बांगलादेशात कट्टरतावादी जमात-ए-इस्लामीच्या वाढत्या प्रभावाचा पाक आणि तुर्कीये यांच्याकडून लाभ उठवण्याचा प्रयत्न !

भारतासाठी धोक्याची घंटा !

बी.एन्.पी.चे प्रमुख तारिक रहमान व तुर्कीएचे बिलाल एर्दोगान

ढाका – बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत कट्टरतावादी इस्लामी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’ सत्तेत येऊ शकला नसला, तरी पूर्वी बंदी घातलेल्या या पक्षाने आघाडीतील सहयोगींसह ७७ जागा जिंकल्या आहेत. बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रभाव वाढला असून पाकिस्तान आणि तुर्कीए यांसारखे इस्लामी देश त्याचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तुर्कीएचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र बिलाल एर्दोगान यांना बांगलादेशात पाठवले. बिलाल एर्दोगान ढाक्यात पोचले, तेव्हा ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे (बी.एन्.पी.चे) प्रमुख तारिक रहमान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला २४ घंटेही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे या दौर्‍याला विशेष महत्त्व दिले जात आहे. तुर्कीए आणि बांगलादेशातील इस्लामी गट यांच्यामधील वाढत्या संबंधांचे हे प्रतीक मानले जात असून भारतासाठी ही धोक्याची घंटा ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

१. बिलाल एर्दोगान यांच्यासोबत तुर्कीएचे माजी फुटबॉलपटू मेसुत ओझिल आणि तुर्कीए सरकारसमर्थित ‘टिका’चे म्हणजेच ‘टर्किश कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन एजन्सी’चे अध्यक्ष अब्दुल्ला आरोनही उपस्थित होते.

२. बिलाल एर्दोगान यांच्या प्रतिनिधी मंडळाने ढाका विद्यापिठात नव्याने उभारलेल्या वैद्यकीय केंद्राचे उद्घाटन केले. या प्रकल्पाला ‘टिका’ संस्थेने निधी दिला आहे. हा वैद्यकीय केंद्र प्रकल्प ‘जमात-ए-इस्लामी’च्या विद्यार्थी संघटनेने ‘ढाका विद्यापीठ केंद्रीय विद्यार्थी संघ’ निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चालू केला होता.

बिलाल एर्दोगान व प्रतिनिधी मंडळ वैद्यकीय केंद्राचे उद्घाटन करताना

३. या दौर्‍याकडे जमात आणि तुर्कीए यांच्यातील वाढत्या निकटतेच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

४. दक्षिण आशियात ‘टिका’ आणि तुर्कीएशी संबंधित इतर इस्लामी संस्था सक्रीय होत असून हे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील मानले जात आहे.

५. पाकिस्ताननेही बांगलादेशाशी द्विपक्षीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रक्रियेत त्याने जमातसोबत सहकार्य वाढवले असून भारताचा प्रभाव अल्प करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

६. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’वर (‘आय.एस्.आय.’वर) आरोप आहेत की, तिने हसीना सरकारच्या विरोधातील आंदोलन भडकवण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’च्या विद्यार्थी संघटनेसोबत काम केले होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानसह आता तुर्कीयेला ताळ्यावर आणण्यासाठी भारताने आक्रमक पावले उचलणे आवश्यक !