देशव्यापी ‘घरवापसी अभियान’ राबवण्यासाठी २५ हून अधिक संघटना एकत्र : संघटित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार !

देहली येथे ‘सनातन घरवापसी फाऊंडेशन’, ‘सनातन संवाद’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने ‘घरवापसी परिषदे’चे आयोजन

व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांसह सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

नवी देहली – येथे ‘सनातन घरवापसी फाऊंडेशन’, ‘सनातन संवाद’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘घरवापसी (धर्मांतरितांना त्यांच्या मूळ हिंदु धर्मात परत घेणे) परिषदे’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय सुरक्षा आणि सनातन परंपरांचे संरक्षण यांसाठी ‘घरवापसी अभियाना’ला देशभरात पुन्हा शक्तीनिशी जागृत करण्याचा संकल्प करण्यात आला. या वेळी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी संघटित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धारही करण्यात अाला. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

‘घरवापसी परिषदे’ला उपस्थित विविध संघटनांचे पदाधिकारी आणि (१) सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

या वेळी ‘घरवापसी’ अभियानाशी संबंधित विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि कायदेशीर सूत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही चळवळ राबवतांना येणार्‍या आव्हानांना प्रभावीपणे कसे तोंड द्यायचे, यावरही चर्चा करण्यात आली. या परिषदेला ‘भारतीय हिंदु शुद्धी सभा’, ‘आर्य समाज’, ‘आर्य समाज देहली’, ‘अग्रव्रत अभियान’, ‘धर्म जागरण’, ‘रा.स्व. स्वयंसेवक संघ’, ‘कर्मयोगी परिषद’, ‘भारतीय रक्षा मंच’, ‘मैत्रेय फाऊंडेशन’ आणि ‘हिंदु विधीज्ञ परिषद’ यांच्या पदाधिकार्‍यांसह देशभरातील २५ हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता, उद्योजक अन् ‘घरवापसी’ चळवळीशी संबंधित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षणचित्र : हिंदु धर्म स्वीकारलेले पूर्वीचे पाद्री आणि अलीकडेच हिंदु धर्म स्वीकारलेले पूर्वीचे मुसलमान हेही ‘घरवापसी’ चळवळीत सहभागी झाले आहेत. तेही या परिषदेला उपस्थित होते.

हिंदूंच्या धर्मांतराला सरकारी उदासीनता कारणीभूत ! सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे उपासना करून दैवी शक्ती जागृत होणे बंद झाले आणि हिंदू धर्मांतरित होऊ लागले. यासमवेतच शासकीय व्यवस्थेचे काही नियम आणि प्रावधान, धर्मांतरासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात मिळणारे आर्थिक साहाय्य, तसेच ‘घरवापसी’साठी प्रयत्न करणार्‍यांना मिळणारे अल्प प्रोत्साहन या गोष्टींमुळे भारतात हिंदूंचे धर्मांतर वाढले.

‘सनातन संवाद’ संकेतस्थळाचे करण्यात आले उद्घाटन !

या प्रसंगी देशभरात कार्यरत असलेल्या ‘घरवापसी’ संघटनांमध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य अधिक शक्तीशाली करण्यासाठी ‘www.sanatansamvaad.com’ या  विशेष ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चे अनौपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले.