भविष्यात कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत आसाममधील काही जण बांगलादेशाला पाठिंबा देऊ शकतात ! – Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली भीती

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामची सद्य:स्थिती फारशी चांगली नाही. आसाममधील मुसलमानांच्या लोकसंख्येचा मोठा भाग बांगलादेशातून बेकायदेशीररित्या आला आहे. ही घुसखोरी मुख्यत्वे त्या काळात झाली, जेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्या सरकारांनी सीमांचे योग्य निरीक्षण केले नाही. त्यामुळे राज्यातील लोकसंख्यात्मक संतुलन बिघडले. बेकायदा घुसखोरी ही आसाम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशासमोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. भविष्यात कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत राज्यातील काही जण बांगलादेशाला पाठिंबा देऊ शकतात, ज्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता आसामचे मुख्यमंत्री हिबंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, राज्याची ओळख, भूमी आणि संसाधने संरक्षित करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. यात बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी मोहिमा, सीमावर्ती भागांत देखरेख वाढवणे आणि एन्आर्सी अद्ययावत करणे यांचा समावेश आहे. सध्याचे सरकार ऐतिहासिक चुका सुधारून राज्याची सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यास कटीबद्ध आहे.

काँग्रेस नेत्यांनी हे आरोप चुकीचे आणि समाजात फूट पाडणारे असल्याचे म्हटले आहे. हे निवेदन खर्‍या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

अशांचा आताच शोध घेऊन त्यांना देशातून हाकलून लावण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम चालवली पाहिजे !