शिक्षणातून डोक्यासह पोटाचाही विचार व्हावा ! – प्रा. मिलिंद जोशी


चिपळूण – आज विविध क्षेत्रांत झपाट्याने पालट होत आहेत. केवळ बौद्धिक शिक्षण देऊन उपयोग नाही. तरुणांच्या पोटाचा प्रश्न सुटलेला नाही, तर देश महासत्ता होण्याची स्वप्ने फोल ठरतील. त्यामुळे शिक्षण देतांना डोक्यासमवेतच पोटाचाही विचार झाला पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली.

मांडकी-पालवण येथील ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की,

१. सहकार क्षेत्राचे अनेकदा नकारात्मक चित्रण केले जाते; मात्र ग्रामीण अर्थकारण बळकट करण्यात सहकार संस्थांचे मोठे योगदान आहे.

२. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागील सामाजिक आणि मानसिक कारणांवरही चर्चा करतांना केवळ नापिकी किंवा कर्जबाजारीपणा नव्हे, तर हरवलेला स्वाभिमान आणि सामाजिक उपेक्षा हेही आत्महत्यांमागील मोठे कारण आहे. जागतिक हिरोंपेक्षा आपल्या मातीतल्या कर्तृत्ववान शेतकर्‍यांच्या यशोगाथा साहित्यामध्ये याव्यात.

विशेष

१. या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजय माने, योगेश खराडे, हरिश्चंद्र देसाई आणि डॉ. अंकुश चोरमुले यांचा सत्कार करण्यात आला.

२. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत दैनिक ‘सकाळ’चे माजी संपादक यमाजी पालकर यांनी घेतली. यामध्ये डॉ. चोरगे यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले. आतापर्यंत ४९ पुस्तके प्रकाशित झाल्याचे सांगत ‘मी माझं गाव शोधतोय’ या विषयावर ५० वे पुस्तक लिहीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

३. आमदार शेखर निकम यांनी ज्ञान, कष्ट आणि आत्मपरीक्षण यांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञान असेल, तर आपण चांगले बोलू शकतो; पण अज्ञानाची जाणीव असेल, तर शिकण्याची सिद्धता रहाते. तरुणांनी ‘शॉर्टकट’ टाळून मेहनतीवर भर द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

४. समारोपाच्या वेळी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी ‘कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा’, तसेच कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन संचमान्यता धोरण रहित करून मराठी शाळांना जीवदान द्यावे’, असे ठराव मांडून ते संमत करण्यात आले.