Bangladesh Election Results : बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ने भारतीय सीमेजवळच्या भागांत ५१ जागा जिंकल्याने भारतासाठी धोका

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत जमात-ए-इस्लामीने एकूण ६८ जागा जिंकल्या असून त्यांपैकी ५१ जागा भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागांत आहेत. जमातचे अमीर शफीकुर रहमान यांनी भारतासमवेत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे आश्वासन दिले होते. हे विधान देशांतर्गत आणि प्रादेशिक राजकारण लक्षात घेऊन केलेले होते. त्या माध्यमातून जमात भारताला महत्त्व देऊ इच्छित होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी शफीकुर रहमान यांनी एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, भारत आमचा सर्वांत जवळचा शेजारी आहे. ही आमची प्राधान्याची गोष्ट आहे.

सीमावर्ती जिल्ह्यांतील ५१ जागांवरील पकड

जमात-ए-इस्लामीला मिळालेल्या ५१ जागांकडे पाहिल्यास त्या भारताच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये आहेत, हे स्पष्ट होते. विशेषतः बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून जमात या जिल्ह्यांत गुप्तपणे कार्यरत आहे. या प्रवाहाची कल्पना अवामी लीगच्या अनुभवी नेत्यांनाही आली नाही. चुकीच्या धोरणात्मक निर्णयांमुळे इस्लामी शक्तींना पुन्हा उभारी घेण्याची संधी मिळाली.

जमातने सीमावर्ती भागांमध्ये जिंकलेल्या ५१ जागांमध्ये निलफामारी येथे ४, रंगपूर ६, कुरीग्राम ४, गैबांधा ४, चपैनवाबगंज ३, नागांव १, राजशाही २, कुश्तिया ३, चुआडांगा २, झेनैदा ३, जेसोर ४, खुलना २, सतखीरा ४, मेहरपूर २, शेरपूर १, मैमनसिंह २, सिलहट १, नोआखली १ आणि चटगाव २ यांचा समावेश आहे. मतमोजणीवरून या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जमातची पकड भक्कम झाल्याचे दिसून येते. भारतीय सुरक्षा विश्लेषक सध्या जमातला मिळालेल्या जागांचे परीक्षण करत असून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

बंगाल आणि ईशान्येकडील राज्ये यांच्यापुढील आव्हान

बंगाल, त्रिपुरा आणि आसाम राज्यांसमोरील बांगलादेशाच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कट्टर इस्लामी गट आणि संघटना काही काळापासून राजकीय प्रभाव वाढवत आहेत, ही गोष्ट चिंतेची आहे. बंगाललगतच्या बांगलादेशी जिल्ह्यांमध्ये सतखीरा, झेनैदाह, जेसोर, चपैनवाबगंज, कुरीग्राम, गैबांधा, कुश्तिया आणि राजशाही येथे परिस्थिती अधिक गंभीर दिसून येते. त्याचबरोबर मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर २४ परगणा, सिलीगुडी आणि कुचबिहार या जिल्ह्यांमध्ये मुसलमान लोकसंख्येमध्ये ठळक आणि हिंसक राजकारणाचा कल वाढल्याचे चित्र आहे.

ढाक्यातील राजकीय विश्लेषकांच्या मते सीमावर्ती भागांमध्ये जमातच्या विजयामागील एक प्रमुख कारण म्हणजे फाळणीनंतर भारतातून गेलेल्या मुसलमानांची वस्ती त्या भागांत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या पुढील पिढ्या जमातला मतदान करत आहेत आणि त्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.