भारतीय शेतकर्‍यांची कोणतीही हानी न करणारा करार ! – Union Minister Piyush Goyal

भारत-अमेरिका व्यापार करारावर उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिली माहिती

उद्योगमंत्री पियुष गोयल

नवी देहली – काही लोक भारतीय शेतकर्‍यांची चिंता करण्याचे ढोंग करतात; पण त्यांना त्यांची चिंता नाही. ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील या व्यापारी करारामुळे भारतीय शेतकर्‍यांची हानी होईल’, हे दावे खोटे आहेत. अमेरिकेतून आयात वस्तू, उत्पादने आणि कृषी संबंधित कोणत्याही वस्तू, उपकरणे, यंत्र यांच्यावर कोणतीही आयात सवलत देण्यात आलेली नाही. कृषी क्षेत्रात आता इतर वस्तूमुळे शेतकर्‍यांची हानी होणार नाही, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

अमेरिकेच्या कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांवरील शुल्कावर कोणतीही सवलत नाही !

मंत्री पियुष गोयल पुढे म्हणाले की, ज्या वस्तू भारतीय शेतकरी निर्माण करतात, जो माल उत्पादित करतात, ज्यात भारत स्वयंपूर्ण आहे, त्या सर्व वस्तू, उत्पादने या कराराच्या बाहेर आहेत. भारताने अमेरिकेतून आयात होणार्‍या कृषी क्षेत्रातील वस्तूंवर कोणतीही सवलत दिलेली नाही. जेनेटिक उत्पादन (इन्सुलिन, रोगप्रतिकारक औषधे आदी) भारतात येणार नाही. मांस आयातीवर कोणती शुल्कमाफी देण्यात आलेली नाही. कुक्कुटपालन व्यवसायात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. दूध आणि दुग्धजन्य उत्पादनावर अमेरिकेकडून आयात वस्तूंना कोणतीही सवलत लागू नाही. सोयाबीन, मका, तांदुळासह साखर, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्ये यांवर कोणतीही सवलत अमेरिकेला देण्यात आलेली नाही, असे पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले.

काबुली चना, मूग, ग्रीन टी, मध, स्ट्रार्च, इथेनॉल, तंबाखू यासह केळी, स्ट्रॉबेरी, चेरी, लिंबूवर्गीय फळे यांच्या आयतीवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. या सर्व उत्पादनांसह इतर कृषीजन्य उत्पादनावर अमेरिकी आयात वस्तू, उत्पादनाला कोणतीही शुल्कमाफी, सलवत या नवीन व्यापार करारामुळे मिळणार नाही, असे मी येथे घोषित करत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.