NSA Ajit Doval : भारत कोणत्याही दबावाला झुकणार नाही, तर ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहील ! – अजित डोवाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेला ठणकाल्यामुळेच झाला भारत-अमेरिका व्यापार करार ! – अमेरिकी वृत्तसंकेतस्थळाचा दावा

डावीकडे अजित डोवाल आणि मार्को रुबिओ

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत अमेरिकेसमवेत चालू असलेली कटुता संपवू इच्छितो आणि पुन्हा व्यापार करारावर चर्चा चालू करण्यास सिद्ध आहे. तथापि भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही. जर अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी यांनी कठोर भूमिका घेतली, तर भारत ट्रम्प यांच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याची वाट पाहू शकतो. भारताने यापूर्वीही अमेरिकेतील कठीण सरकारांचा सामना केला आहे, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची अमेरिकेत जाऊन भेट घेऊन त्यांना चेतावणी दिली होती. याचाच परिणाम म्हणून अमेरिकेने भारताशी व्यापार करार करत भारतावरील आयात शुल्क ५० वरून १८ टक्के केले, असा दावा अमेरिकेतील वृत्तसंकेतस्थळ ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात करण्यात आला आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, डोवाल यांनी असेही म्हटले होते की, भारताला असे वाटते की, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी यांनी भारताविरोधात उघडपणे वक्तव्य करणे थांबवावे, जेणेकरून संबंध पुन्हा सुरळीत येऊ शकतील.

डोवाल यांच्या या चर्चेनंतर काही दिवसांतच परिस्थिती पालटू लागली. १६ सप्टेंबर या दिवशी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दूरभाष केला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर वर्षाच्या अंतापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये आणखी ४ वेळा दूरभाषवर चर्चा झाली. याच काळात दोन्ही देश कर अल्प करण्याच्या कराराच्या दिशेने वाटचाल करत राहिले.