काँग्रेसला केवळ घुसखोर बांगलादेशींची चिंता ! – Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका

राहुल गांधी व हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – काँग्रेसला केवळ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची चिंता आहे, आसाममधील मूळ रहिवाशांच्या हिताची नाही. सहस्रो गौरव गोगोई (काँग्रेसचे खासदार) आणि राहुल गांधी माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. सध्या आसामच्या लोकांसाठी परिस्थिती पुष्कळ नाजूक आहे. राज्यात त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसवर केली.

‘एक्स’वर प्रसारित केलेल्या माहितीमध्ये मुख्यमंत्री सरमा यांनी लिहिले की, आसामवर शांतपणे आणि कपट याद्वारे होत असलेले लोकसंख्याशास्त्रीय आक्रमण आसाममधील भू-रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या हानीचे कारण बनू शकतो. हे न्यायालयाचे स्वतःचे शब्द आहेत. अवैध स्थलांतरितांची संख्या राज्यातील काही जिल्ह्यांना मुसलमानबहुल क्षेत्रात पालटत आहे. यानंतर बांगलादेशात त्यांच्या विलीनीकरणाची मागणी केली जाऊ शकते, ही केवळ वेळेची बाब असेल. आसामच्या हानीमुळे ईशान्येकडील संपूर्ण भूभाग उर्वरित भारतापासून वेगळा होईल आणि त्या प्रदेशातील समृद्ध नैसर्गिक संसाधने राष्ट्राच्या हातून निसटतील. या समस्येचा स्वीकार करणे म्हणजे धर्मांधता किंवा द्वेष नाही.

‘मिया मुसलमान’ शब्द माझा नाही !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘मिया मुसलमान’ शब्दावरील वादावर सांगितले की, ‘मिया मुसलमान’ शब्द मी निर्माण केलेला नाही आणि हा शब्द बांगलादेशातून येऊन स्थायिक झालेल्या समुदायाकडूनच वापरला जातो. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या शब्दाचा वापर केला आहे.

हा न्यायालयाचा अवमान ! – काँग्रेस खासदार गौरव गोगोई

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई म्हणाले की, मुख्यमंत्री सरमा त्यांच्या विधानांना योग्य ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नावाचा अपवापर करत आहेत. एका कार्यकारी अहवालाची भाषा सर्वोच्च न्यायालयाशी जोडणे हा न्यायालयाचा अवमान आहे.