साधना आणि धर्माचरण यांनी आपले जीवन आनंदी अन् समृद्ध होते ! – सद्गुरु सत्यवान कदम

उभळे येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन  

मार्गदर्शन करतांना सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांच्या उजवीकडे श्री. सुरेश शिंदे

चिपळूण, २२ जानेवारी (वार्ता.) – भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी आहे. सनातन संस्कृती हा भारताचा आत्मा आहे. जगभरातून लोक मन:शांतीसाठी भारतात येतात; पण दुर्दैवाने अध्यात्म म्हणजेच साधना आणि धर्माचरण यांचे शिक्षण न मिळाल्याने आज आपली कस्तुरीमृगासारखी अवस्था झाली आहे. ज्याप्रमाणे कस्तुरीमृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते; पण तो मृग कस्तुरीच्या शोधासाठी धावाधाव करतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जण आनंदाचा शोध घेत आयुष्यभर धावतो; मात्र  हा आनंद आपल्याला सतत अनुभवता येत नाही. पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून सुख मिळवतो आणि त्या सुखालाच बहुतेक वेळा आपण आनंद मानला जातो. आनंद हा आत्म्याला येणारा अनुभव आहे, हेच आपल्याला ठाऊक नसते. अध्यात्मशास्त्राप्रमाणे काळानुसार साधना आणि धर्माचरण केले, तर आपले जीवन आनंदी अन् समृद्ध होते, असे मार्गदर्शन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

१६ जानेवारी या दिवशी तालुक्यातील उभळे गावातील सहानेवर सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले या वेळी ते बोलत होते.

 सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान करतांना ग्रामस्थ श्री. सदानंद चव्हाण आणि मधुकर चव्हाण

सद्गुरु कदम पुढे म्हणाले की, कलियुगात नामस्मरण हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे  आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक आहे, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. कुलदेवता ही प्रारब्धाशी म्हणजेच नशिबाशी संबंधित देवता असल्याने तिची उपासना आणि नामजप लाभदायक होतो.
सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान वयोवृद्ध ग्रामस्थ श्री. सदानंद चव्हाण आणि मधुकर चव्हाण यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून केला. या प्रवचनाचा लाभ गाव अध्यक्ष श्री बळीराम चव्हाण, श्री. शामकांत चव्हाण, श्री. सुनील साळवी यांच्यासह  अनेक जिज्ञासूंनी घेतला. धर्मप्रेमी श्री. अविनाश चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रवचनाचे नियोजन केले.

मनोगत – श्री. सतीश चव्हाण, ग्रामस्थ- कलियुगात आचरण करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मंडळी इतक्या लांबून आमच्यासाठी येता. साधना होण्यासाठी खरे तर आठवड्यातून एकत्र येण्याची आवश्यकता आहे.