निसर्गातून संस्कृती जन्मते; पण संवेदनशीलता हरवल्याने निसर्गाचा र्‍हास होत आहे !

‘आधारवड’ सत्रात रानमाणूस प्रसाद गावडे यांनी व्यक्त केली खंत

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – ‘गावे हरवत चालली आहेत, डोंगर पोखरले जात आहेत. जे हरवत चाललो आहोत, ते आपल्याला परत मिळणार नाही. माणसांचे, निसर्गाचे अधिवास वाचवायला हवेत. निसर्गातून संस्कृती जन्मते; पण संवेदनशीलता हरवल्याने निसर्गाचा र्‍हास होत आहे, अशी खंत रानमाणूस प्रसाद गावडे यांनी येथे व्यक्त केली. ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी संमेलनात ‘आधारवड’ सत्रात गावडे बोलत होते. या सत्रात गोशाळेचे संस्थापक कमलाकांत तारी आणि रस्त्यावर असलेल्या निराधार माणसांना आधार देणारे संदीप परब यांचे अनुभव ऐकणे हा हृदयस्पर्शी क्षण होता.

श्री. प्रसाद गावडे

गावडे पुढे म्हणाले, ‘‘निसर्गात रहाणारी माणसे संवेदनशील असतात. गावची माणसे मनाने श्रीमंत असतात. ही माणसे माझी प्रेरणा आहे. इथल्या माणसांच्या संवेदना माझ्यामध्ये जागृत झाल्या. मी माणूसप्रेमी आहे. जंगलांचा भाग जपायला हवा; कारण आदिवासी लोकांचा, पशूपक्ष्यांचा तो अधिवास आहे. जंगलावर आधारित अन्नसंस्कृती आहे. निसर्गाकडून आपण घेत असतो, त्याचा आदर केला पाहिजे.’’

संदीप परब म्हणाले, ‘‘निराधार होऊन रस्त्यावर आलेली माणसे आणि वृद्ध यांना जगण्याचा अधिकार आहे. मी रस्त्यावर निपचित पडून असलेल्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. काही जणांना जखमा होऊन त्यात किडे झाले होते. अशा सहस्रो जणांच्या जखमांवरील किडे या हातांनी काढले. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पहाणे पुरस्कारांपेक्षा मला मोठे वाटते. गोव्यातील लोकांकडे दातृत्व आहे, चांगले जीवन आहे, ते नव्या पिढीला शिकवायला हवे.’’

प्लास्टिक खाऊन गायी मरत आहेत, हे बघून दुःख होते ! – कमलाकांत तारी

श्री. कमलाकांत तारी

गोरक्षक कमलाकांत तारी म्हणाले, ‘‘माझ्या आई-वडिलांचे समाजकार्य चालू होते. तोच वसा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, दुसर्‍यांचे भले होईल, याचा विचार केला. हरिद्वार येथे ‘गोमाता को बचाना है, देश को बचाना है ।’, हे बाबा रामदेव यांचे आवाहन ऐकले आणि गोव्यात पतंजलीच्या कार्यकर्त्यांना घेऊन गोसंवर्धनाचे काम चालू केले. गायींची हत्या होऊ नये; म्हणून संघर्ष केला. २ गायी घेऊन चालू केलेल्या गोशाळेत आज ६ सहस्र गायी आहेत. त्यांचा एका दिवसाचा खर्च ९ लाख रुपये आहे. प्लास्टिक खाऊन गायी मरत आहेत, हे बघून दुःख होते. प्लास्टिक खाल्लेल्या गायींची जेव्हा शस्त्रक्रिया केली, त्या वेळी ३५ ते ६५ किलो प्लास्टिक त्यांच्या पोटात सापडले.’’

सत्राचा समन्वय लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आणि लेखिका सौ. पौर्णिमा केरकर यांनी केला. त्यांनी ‘लोकपरंपरेने जपलेली संवेदनशीलता आज हरवली आहे’, याकडे निर्देश करून वक्त्यांनी स्वीकारलेल्या व्रतासाठी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला.