ABVP Adhiveshan : आभासी जगापेक्षा कृतीशील जीवनशैली अंगीकारण्याचा ठराव संमत !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन

‘स्क्रीनटाइम’ वाढणे, हा युवकांच्या आरोग्यासाठी गंभीर आव्हान असल्याची चर्चा !

(‘स्क्रीन टाइम’ वाढणे म्हणजे भ्रमणभाष, संगणक, दूरदर्शन, टॅब्लेट यांसारख्या डिजिटल उपकरणांवर घालवला जाणारा वेळ वाढणे)

अधिवेशनात दीपप्रज्वलन करतांना मंत्री गिरीश महाजन, संघटनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर

नाशिक, ११ जानेवारी (वार्ता.) : भ्रमणभाष, संगणक, दूरदर्शन, टॅबलेट आदी डिजिटल साधनांवर घालवला जाणारा वाढता ‘स्क्रीनटाइम’ हा युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटी टाइम’ म्हणजेच आभासी जगातून बाहेर येऊन प्रत्यक्ष कृतीशील जीवनशैली अंगीकारणे अत्यावश्यक आहे, असा ठराव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला. ही माहिती सांगली येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, सांगली महानगर अध्यक्ष डॉ. सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अवनीश यादवाडे उपस्थित होते. या अधिवेशनाला राज्यभरातून एकूण ७७६ प्रतिनिधी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की,

१. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे ६० वे ‘हिरक महोत्सवी’ अधिवेशन नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, डोंगरे वसतीगृह मैदान येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत उत्साहात पार पडले.

२. अधिवेशनात युवकांच्या आरोग्यासमवेतच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

३. राज्यातील विविध विद्यापिठांनी घेतलेला ‘कॅरी ऑन’चा (अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळण्याची सोय होणे) निर्णय, तसेच शैक्षणिक वेळापत्रकातील अनियमितता, यांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दूरगामी आणि नकारात्मक परिणाम होतात, याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.

४. ‘नाशिकच्या कुंभनगरीत शाश्वत विकास व्हावा’, अशी मागणी करणारा ठरावही अधिवेशनात संमत करण्यात आला.