India 4th largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

वर्ष २०३० पर्यंत तिसर्‍या स्थानी पोचण्याचे लक्ष्य

नवी देहली – जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ४.१८ ट्रिलियन डॉलर (सुमारे ३७४ लाख ५० सहस्र कोटी रुपये) इतका अंदाजित करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. सध्याची गती कायम राहिल्यास वर्ष २०३० पर्यंत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत (सुमारे ६४९ लाख ७० सहस्र कोटी रुपयांपर्यंत) पोचू शकते. असे झाल्यास भारत जर्मनीलाही मागे टाकेल. सध्या अमेरिका जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. चीन दुसर्‍या आणि जर्मनी तिसर्‍या क्रमांकावर आहे.

१. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसर्‍या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचे प्रमाण ८.२ टक्के राहिला. यापूर्वी पहिल्या तिमाहीत तो ७.८ टक्के आणि मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ७.४ टक्के होता.

२. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या विकास दराविषयी सकारात्मक अंदाज व्यक्त केले आहेत. जागतिक बँकेने वर्ष २०२६ साठी ६.५ टक्के वाढीचा अंदाज लावला आहे. ‘मूडीज’ संस्थेच्या मते, भारत वर्ष २०२६ मध्ये ६.४ टक्के आणि वर्ष २०२७ मध्ये ६.५ टक्के वाढीसह ‘जी-२०’ देशांमध्ये सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.

३. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ष २०२६ साठी ६.२ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने वर्ष २०२६ मध्ये ६.२ टक्के वाढीचा अंदाज दिला आहे.

वर्ष २०४७ पर्यंत ‘उच्च मध्यम-उत्पन्न असलेला देश’ बनण्याचे लक्ष्य

केंद्र सरकारने म्हटले आहे की, भारत वर्ष २०४७ पर्यंत ‘उच्च मध्यम-उत्पन्न असलेला देश’ बनण्याच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. ‘उच्च मध्यम-उत्पन्न असलेला देश’ म्हणजे असा देश ज्याच्या नागरिकांचे जीवनमान विकसित देशांतील लोकांइतके उच्च नसले, तरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाची पातळी बर्‍यापैकी चांगली असते अन् औद्योगीकरण आणि शहरीकरण वेगाने होत असते.