बांगलादेशातील हिंदूंवर प्रतिदिन होत असलेले अनन्वित अत्याचार !

हिंदूंवरील अत्याचारांच्या १ सहस्रहून अधिक प्रकरणांसह संयुक्त राष्ट्रांतील कार्यकर्ते आणि ‘मानवाधिकार आणि न्याय विभागा’चे (‘ब्युरो ऑफ ह्यूमन राइट्स अँड जस्टिस’चे) अध्यक्ष दीपन मित्रा यांनी बांगलादेश सरकारची काळी बाजू उघड केली. ते म्हणाले, ‘‘इस्लामी कट्टरतावादी आणि युनूस प्रशासन एक आपत्ती बनले आहेत. भारत ही शेवटची आशा आहे. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती आणि आदिवासी समुदाय यांना राज्य अन् सामाजिक स्तरावर सातत्याने भेदभावाला सामोरे जावे लागत आहे; परंतु आता परिस्थितीने ‘भयावह वळण’ घेतले आहे.

५ ऑगस्ट २०२४ या दिवशी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना कोणत्याही औपचारिकतेविना सत्तेवरून हटवण्यात आले होते. त्या दिवशी हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांची सुरक्षा अन् प्रतिष्ठा संपुष्टात आली; कारण इस्लामी जमावांनी हिंदूंना मारण्यासाठी, लुटण्यासाठी आणि बलात्कार करण्यासाठी निवडकपणे लक्ष्य करण्यास प्रारंभ केले, तसेच त्यांच्या मंदिरांची अन् मूर्तींची तोडफोड करून त्यांची विटंबना करण्यात आली.’’

हिंसक इस्लामी जमाव

‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगा’ने (‘यू.एन्.एच्.आर्.सी.’ने) आयोजित केलेल्या ‘अल्पसंख्यांक समस्यांवरील मंचा’च्या १८ व्या सत्रात बोलतांना बांगलादेशी हिंदु  हक्क कार्यकर्ते दीपन मित्रा यांनी इस्लामवाद्यांनी बांगलादेशी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांच्या घटनांवर प्रकाश टाकला. याविषयीची सूत्रे येथे देत आहोत.   (पूर्वार्ध)

१. हिंदूंची हत्या, बलात्कार आणि महिलांचे बळजोरीने धर्मांतर 

गेल्या एका वर्षात १८३ हून अधिक हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, २१९ हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले, सहस्रो हिंदूंची घरे आणि व्यवसाय यांवर आक्रमणे करून त्यांना आग लावण्यात आली. याखेरीज हिंदु आणि बौद्ध समुदायातील ७८ मुलींचे बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले.

कोण आहेत दीपन मित्रा ?

श्री. दीपन मित्रा

दीपन मित्रा हे एक बांगलादेशी हिंदु आहेत. ते सध्या फ्रान्समध्ये रहात आहेत. ते मानवाधिकार आणि न्याय विभागाचे अध्यक्ष आहेत. ते ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या बांगलादेश शाखेचे सरचिटणीसही होते. ते ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या युरोपियन युनियन शाखेचे समन्वयक आणि ‘दक्षिण आशियाई पीपल्स फोरम’चे कार्यकारी सदस्यही आहेत.

२. ईशनिंदेच्या आरोपावरून प्रतिदिन हिंदूंवर अत्याचारांच्या घटना होत असणे

ईशनिंदेच्या आरोपावरून हिंदूंवर आक्रमणे, हिंदूंचे मठ आणि मंदिरे यांवर कब्जा, हिंदु व्यापार्‍यांकडून खंडणी वसूल करणे, या घटना बांगलादेशात प्रतिदिनच घडतात. हिंदूंची मालमत्ता जप्त केली जात नाही, घरांवर आक्रमणे केली जात नाहीत, तोडफोड केली जात नाही आणि जाळपोळ केली जात नाही, असा एकही दिवस जात नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये ‘ऑपइंडिया’ने मुसलमान जमावाने हिंदु मंदिरे आणि घरे यांवर आक्रमण केल्याची अनेक प्रकरणे नोंदवली होती. त्या वेळी ‘अल जझिरा’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘डी. डब्ल्यू.’ यांसारख्या साम्यवादी माध्यमांनी हिंदूंवरील हिंसाचाराला ‘राजकीय सूड’ म्हणून न्यून लेखण्याचा प्रयत्न केला होता, तसेच हिंदु समुदायाने ‘अवामी लीगला पाठिंबा दिला; म्हणून आक्रमणे झाली’, असे म्हटले होते. काही घटनांमध्ये जमावाने अवामी लीगच्या हिंदु नेत्यांना लक्ष्य केले, ही वस्तूस्थिती आहे. ही आक्रमणे केवळ राजकीय वैर किंवा सूड उगवण्यापुरती मर्यादित नव्हती. नाटोर, ढाकामधील धामराई, पटुआखलीमधील कालपारा, शरीयतपूर आणि फरिदपूर येथील हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली. जेसोर, नोआखाली, मेहरपूर, चांदपूर आणि खुलना येथे हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. दिनाजपूरमध्ये ४० हिंदु दुकानांची तोडफोड करण्यात आली.

५ ऑगस्ट २०२४ या दिवशी शेख हसीना यांना भारतात पळून जाण्यास भाग पाडले गेले, तेव्हा या घटना उघडकीस आल्या.

महंमद युनूस यांनी निवडून न आलेल्या अंतरिम सरकारचे सल्लागार म्हणून पदभार स्वीकारल्यापासून हिंदूंच्या हत्या, बलात्कार, छळ आणि लूटमार यांच्या घटना वाढत आहेत. इस्लामवादी गट हिंदूंना पूर्वीपेक्षा अधिक धैर्याने लक्ष्य करत आहेत.


डॉक्टर, व्यावसायिक आणि हिंदु विचारवंत यांना इस्लामी गटांकडून त्रास दिला जाणे !

रुग्णालयांमधील महत्त्वाच्या पदांवरूनही हिंदु डॉक्टरांना हटवले जात आहे. बांगलादेशाचे प्रसिद्ध डॉ. सामंतलाल सेन यांच्यावरही हत्येचा खोटा आरोप करण्यात आला होता. ‘हिंदु विचारवंत आणि व्यावसायिक यांना इस्लामी गटांकडून त्रास दिला गेला अन् त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडले गेले’, असा अहवाल ‘ऑपइंडिया’ने दिला होता. अनेकांना केवळ त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे बांगलादेश सोडण्यास भाग पाडले गेले. ऑगस्ट २०२४ मध्ये ६० हिंदु शिक्षक, प्राध्यापक आिण सरकारी अधिकारी यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले गेले. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी परिस्थिती बिघडत गेली. ऑक्टोबर २०२४ मध्ये सीताकुंदामध्ये जमावाने हिंदु पत्रकार लिटॉन कुमार चौधरी यांच्यावर आक्रमण केले. असद भगिनींच्या गटाच्या सदस्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. इस्लामी आक्रमणकर्त्यांनी लिटॉन कुमार चौधरी यांना ‘अवामी लीगचा दलाल’ म्हणून संबोधून त्यांची अपकीर्ती केली आणि त्यांच्यावर ‘खोट्या बातम्या पसरवल्या’, असा आरोप केला. यावर्षी जुलैमध्ये बांगलादेशातील चटगांव विद्यापिठात शिकणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांनी डॉ. कुशल बरन चक्रवर्ती या हिंदु प्राध्यापकाला त्रास दिला आणि त्याची पदोन्नती थांबवली. आगाऊ नियोजन करून विद्यार्थी कार्यालय इमारतीबाहेर जमले आणि गदारोळ चालू केला. यापैकी बरेच विद्यार्थी ‘बांगलादेश जमात-ए-इस्लामी’च्या विद्यार्थी शाखेचे ‘इस्लामी छात्र शिबीरा’चे सदस्य होते. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर दडपशाही चालूच आहे. नास्तिक, लेखक आणि ‘ब्लॉगर्स’ (संकेतस्थळावर लेख लिहिणारे लेखक) यांची हत्या केली जात आहे किंवा त्यांना देश सोडण्यास भाग पाडले जात आहे.

– श्रद्धा पांडे

३. बांगलादेशामधील हिंदूंना नोकरीवरून हटवण्याची चळवळ 

बांगलदेशामध्ये एका परिषदेच्या माध्यमातून हिंदु अधिकारी आणि शिक्षक यांना पद्धतशीरपणे नोकरीवरून हटवण्याची चळवळ चालू आहे. ‘निवडणूक आयोगा’चे सचिव अशोक कुमार देबनाथ, ‘प्राथमिक शिक्षण विभागा’चे अतिरिक्त महासंचालक उत्तम कुमार दास, ‘प्रेस कौन्सिल’चे सचिव श्यामल चंद्र कर्माकर, कोलकाता येथील उप महाव्यवस्थापक कार्यालयाचे प्रेस सचिव रंजन सेन आणि कॅनडातील उच्चायुक्तांच्या सल्लागार अपर्णा राणी पाल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. गेल्या एका वर्षात १७६ हिंदु शिक्षकांना शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ येथून त्यागपत्र देण्यास किंवा काढण्यास भाग पाडले गेले. या व्यतिरिक्त कृष्णपद रॉय यांच्यासह १०० हून अधिक हिंदु पोलिस अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. वर्ष २०२४ मध्ये राजशाही सारडा पोलीस अकादमीत निवडलेल्या २५२ उपनिरीक्षकांपैकी ९९ हिंदु, २ बौद्ध आणि १ ख्रिस्ती यांना हटवण्यात आले आहे.

महंमद युनूस सरकारच्या गृहमंत्रालयाने पोलीस प्रमुख बहरुल आलम यांना पोलीसदलात कोणत्याही हिंदूंची नियुक्ती न करण्याचे निर्देश दिले आहेत. निमलष्करी दलांमध्येही भेदभाव पोचला आहे. वर्ष २०२५ मध्ये ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’मध्ये ६९३ लोकांची भरती करण्यात आली होती; परंतु त्यामध्ये एकही अल्पसंख्यांक नव्हता.

४. बांगलादेशात अल्पसंख्यांकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार नाही !

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार नाही. अल्पसंख्यांकांचे संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम थांबवण्यासाठी दबाव आणला जात आहे अन् सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम थांबवले जात आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारने प्राथमिक शाळांमधील संगीत आणि शारीरिक शिक्षणाच्या साहाय्यक शिक्षकांची पदे रहित केल्याचे वृत्त आले. युनूस राजवटीचा निर्णय स्पष्टपणे मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न होता; कारण बांगलादेशातील कट्टरतावादी इस्लामी संघटना बर्‍याच काळापासून संगीत शिक्षकांच्या जागी इस्लामी विद्वानांची भरती करण्याची मागणी करत होत्या.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्रद्धा पांडे (साभार : ‘ऑपइंडिया’चे संकेतस्थळ)

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी जगभरातील हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक !

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/991977.html