Notice To Advocate Rohan Malvadkar : १ जानेवारी या दिवशी कोरेगाव-भीमा येथील ‘जयस्तंभ’ जवळील घरी रहाण्यास टाळण्याविषयी नोटीस

अधिवक्ता रोहन माळवदकर जमादार यांना लोणीकंद पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीत सूचना

कोरेगाव-भीमा लढाई

पुणे, २७ डिसेंबर (वार्ता.) – कोरेगाव-भीमा लढाईचे शिलेदार खंडोजी जमादार (माळवदकर) यांचे अधिवक्ता रोहन माळवदकर जमादार हे थेट ७ वे वंशज आहेत. त्यांनी ‘कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकाच्या माध्यमातून खरा इतिहास पुराव्यानिशी मांडला आहे. त्यांच्या शेतभूमीत ‘जयस्तंभ’ आहे आणि त्याच्या बाजूलाच त्यांचे घर आहे. तिथे त्यांनी १ जानेवारी या दिवशी रहाण्याचे टाळावे, असा सल्ला लोणीकंद पोलीस प्रशासनाने त्यांना दिला आहे. सामाजिक माध्यमातून २ समाजांत तेढ होईल, असे कुठलेही संदेश प्रसारित करू नये, असेसुद्धा त्या नोटीसमध्ये लिहिले आहे. (पोलीस प्रशासनाने अशी समज देणारी नोटीस सामाजिक माध्यमातून ‘कोरेगाव-भीमा लढाई’ विषयी दिशाभूल करणारी, तेढ निर्माण करणारे चलचित्र, संदेश प्रसारित करणार्‍यांना दिली आहे का ? अधिवक्ता माळवदकर यांना स्वत:च्या घरात रहायचे नाही, तर पोलीस ठाण्यात येऊन रहाणे पोलिसांना अपेक्षित आहे का ? पोलीस अकार्यक्षम आणि भित्रे झाल्यामुळे ते अधिवक्ता माळवदकर यांना राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य नाकारत का आहेत ? – संपादक)

अधिवक्ता रोहन माळवदकर यांना देण्यात आलेली नोटीस

 

नोटीसला अधिवक्ता रोहन माळवदकर यांनी दिलेले उत्तर

१. ही नोटीस म्हणजे राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा !

सदर नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे थेट उल्लंघन करणारी आहे. ‘जयस्तंभाच्या शेजारी आमचे स्वतःचे घर असून आम्ही त्या ठिकाणी कधी यावे आणि कधी येऊ नये ?’, हे ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. आम्हाला आमच्या निवासस्थानी जाण्या-येण्याविषयी निर्देश देणे म्हणजे राज्यघटनेने नागरिकाला दिलेल्या घटनादत्त मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे.

२. जयस्तंभाचा खरा इतिहास सांगण्याचा अधिकार 

सामाजिक माध्यमावर मी आजतागायत जयस्तंभ किंवा कोरेगाव-भीमा लढाईविषयी कोणतेही आक्षेपार्ह, चिथावणीखोर अथवा समाजात तेढ निर्माण करणारे विचार प्रसारित केलेले नाहीत आणि भविष्यातही करणार नाही; मात्र शासकीय दस्तऐवज, अभिलेख आणि ठोस पुरावे यांच्या आधारे सत्य इतिहास मांडण्याचा माझा हक्क असून तो मी आजपर्यंत वापरलेला आहे आणि पुढेही वापरत रहाणार आहे.


हे ही वाचा → हिंदुत्वाचे शिलेदार ! 

अधिवक्ता रोहन माळवदकर

क्लिक करा → कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव समाजासमोर आणणारे आणि हिंदुत्वाचे निःस्वार्थ भावाने कार्य करणारे अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर !


३. चुकीचा इतिहास प्रसारित करणार्‍यांवर प्रथम कारवाई करावी !

जर ‘सत्य इतिहास मांडणे’ म्हणजे २ समाजांमध्ये तेढ निर्माण करणे, असा या नोटीसीचा अर्थ असेल, तर मग पोलिसांनी चुकीचा, विकृत आणि खोटा इतिहास पसरवणार्‍यांवर प्रथम कारवाई करण्यात यावी. मी केवळ सत्य सांगून आणि शासकीय पुराव्यांच्या आधारे वास्तव इतिहास समाजासमोर मांडून समाजाची होणारी दिशाभूल थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामागे माझा कोणताही अन्य हेतू नाही आणि कधीही नव्हता.

४. सरकारने सत्य इतिहास सांगायला पुढाकार घ्यावा !

माझ्या मतांवर मी ठाम रहाणारच आहे. सत्य इतिहास सांगायला मला कुणाची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही; कारण मला राज्यघटनेने तो अधिकार दिला आहे. मी सत्य इतिहास सांगतो म्हणून जर कुणाच्या भावना दुखत असतील, तर त्यांना इतिहासाचा समकालीन कागदपत्रांच्या आधारावर अभ्यास करणे आवश्यक आहे आणि सरकारने यामध्ये सत्य सांगायला पुढाकार घ्यावा. प्रशासनानेच सत्य इतिहास सांगण्याचे कष्ट घेणे आवश्यक आहे.

कोरेगाव भीमाची लढाई आणि दंगल 

कोरेगाव भीमाची लढाई ही कुठल्या जाती-धर्माविरुद्ध नसून इंग्रज विरुद्ध मराठा सैन्य अशी होती आणि ही लढाई अचानक झाली होती. कोरेगावच्या लढाईमध्ये मराठ्यांच्या बाजूने अरब, गोसावी अशा ३ सहस्र सैनिकांच्या तुकडीविरुद्ध इंग्रजांचे ८३४ सैनिक लढले. या ८३४ सैनिकांच्या ३ तुकड्या होत्या. पहिल्या तुकडीत ५०० पायदळ होते, यात ब्राह्मण, मराठा, गुर्जर, शीख, मुसलमान, अहिर आणि महार असे सैनिक होते. दुसर्‍या तुकडीमध्ये २५० घोडेस्वार होते आणि तिसरी तुकडीमध्ये केवळ युरोपियन होते. याप्रकारे सैनिकी यंत्रणा होती; परंतु आता काही लोक ही लढाई ‘५०० महारांविरुद्ध २८ सहस्र पेशवा’, अशी होती, असे सांगत आहेत. यामागचा उद्देश ‘महार’ समाजाला हिंदूंपासून दूर करणे’, असा आहे. या लढाईच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे इंग्रजांनी जयस्तंभ उभारला.

१ जानेवारी २०१८ या दिवशी या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यशासनाकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; मात्र आदल्या दिवशी पुण्यात पुरो(अधो)गामी संघटनांच्या एल्गार परिषदेत वक्त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे जयस्तंभाच्या परिसरात तणाव निर्माण होऊन दंगल उसळली. यामध्ये राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला होता. या दंगलीचे अन्वेषण अद्यापही चालूच आहे. 

संपादकीय भूमिका

  • ज्यांच्या जागेत जयस्तंभ आहे आणि ज्यांच्या वंशजांकडे ते सांभाळण्याचे दायित्व आहे, त्यांनाच घरात न थांबण्याची अशी नोटीस स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच एखाद्याला पोलिसांनी दिलेली आहे !
  • ज्या पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेसह नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचे रक्षण करणे अपेक्षित आहे, तेच नागरिकांना पलायन करण्यास सांगून स्वत:चा षंढपणा आणि भित्रेपणा ही नोटीस देऊन प्रदर्शित करत आहेत, असेच जनतेला वाटते !