श्रीलंकेला सर्वतोपरी साहाय्य करण्याचा भारताचा पुनरुच्चार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसनायके यांना आश्वासन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसनायके

नवी देहली – ‘दिटवा’ चक्रीवादळाचा जोरदार फटका बसलेल्या श्रीलंकेला सर्वतोपरी साहाय्य करण्याचा पुनरुच्चार भारताने केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके यांना तसे आश्वासन दिले. भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधू’अंतर्गत श्रीलंकेला साहाय्य केले जात आहे.

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती दिसनायके यांना आश्वासन दिले की, भारत या कठीण काळात श्रीलंकेच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि येणार्‍या काळात  साहाय्य आणि पुनर्वसन करण्याच्या श्रीलंकेच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देत राहील. राष्ट्रपती दिसनायके यांनी भारताच्या जलद साहाय्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. यासह श्रीलंकेतील प्रभावित प्रदेशातील नागरिकांनी भारताने वेळेवर साहाय्य केल्याविषयी मनापासून भारताचे आभार मानले.

भारताकडून ‘ऑपरेशन  सागर बंधू’द्वारे व्यापक साहाय्य !

‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत भारताने ५३ टनांहून अधिक वजनाचे साहाय्य साहित्य पुरवले आहे. यासह आवश्यक उपकरणे, वैद्यकीय साहाय्य आणि आपत्कालीन शिधा विमानाने पोचवला आहे. भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर, आय.ए.एफ्. विमान आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या पथकांनी एकत्रितपणे परदेशी नागरिकांसह १२० हून अधिक लोकांना वाचवले आहे. अनेक भागांत अडकलेल्या कुटुंबांना साहाय्य केले जात आहे. भारताने विशेष आणि व्यावसायिक उड्डाणांद्वारे अनुमाने दीड सहस्र अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यास साहाय्य केले आहे.