Arunachal Pradesh Woman : अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचे सांगून चीनकडून भारतीय महिलेचा १८ घंटे छळ !

अरुणाचल प्रदेश हा निःसंशयपणे भारताचा अविभाज्य भाग ! – भारत

भारतीय महिला पेमा वांग थोंगडोक

शांघाय (चीन) – भारतातील अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असलेल्या पेमा वांग थोंगडोक यांचा येथील पारपत्र अधिकार्‍यांनी छळ केला. ‘अरुणाचल प्रदेशाचा पत्ता असूनही भारताचे पारपत्र कसे ?’, असे विचारत त्यांच्या पारपत्राला अवैध ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी पेमा यांना १८ घंटे डांबून ठेवण्यात आले. पेमा यांनी ‘एक्स’वर ही माहिती देऊन स्वत:ची व्यथा मांडली. त्या म्हणाल्या की, शांघाय विमानतळावरील अधिकार्‍यांनी माझे पारपत्र अवैध ठरवले. माझा जन्म अरुणाचल प्रदेशातील असल्याचे त्यात नमूद असल्यावरून ‘अरुणाचल प्रदेश चीनचा भाग आहे’, असे सांगत त्यांनी माझे पारपत्र अवैध असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी मला १८ घंटे डांबून ठेवले.

यावर भारताने चीनला ‘कुठल्याही भ्रमात राहू नका. अरुणाचल प्रदेश हा आमचा भाग आहे’, अशा शब्दांत दरडावले. यासमवेतच चीनला नागरी विमान वाहतुकीशी संबंधित ‘शिकागो करार १९४४’ आणि ‘मॉन्ट्रियाल करार १९९९’ यांची आठवण करून देत चीनचे हे कृत्य या करारांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले.

पेमा या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्या लंडनहून जपानला जात होत्या. त्यांचे विमान काही घंट्यांसाठी शांघायमध्ये थांबले होते. तेव्हा ही घटना घडली.

संपादकीय भूमिका

भारताने आता चीनला केवळ असे दरडावून थांबू नये, तर अरुणाचल प्रदेशातील वस्तूस्थिती जगासमोर आणण्यासाठी विदेशी राष्ट्राध्यक्षांचे भारतातील दौरे अरुणाचल प्रदेशात ठेवावेत. जागतिक व्यासपिठांवर ‘अरुणाचल प्रदेशाची भूमी भारताचीच आहे’, असे वारंवार मांडावे, तसेच प्रसारमाध्यमांद्वारेही राज्यातील वास्तविक परिस्थिती जगासमोर ठेवून चीनला उघडे पाडावे !