Congressi P. Chidambaram : (म्हणे) ‘भारतात अंतर्गत आणि बाहेरील, असे दोन प्रकारचे आतंकवाद !’

  • लाल किल्ल्याजवळील बाँबस्फोटाचे प्रकरण

  • काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे विधान

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम्

नवी देहली : पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या आधी आणि नंतरही मी हेच सांगत आहे की, आतंकवादी दोन प्रकारचे असतात. घुसखोरी करणारे आणि देशांतर्गत वाढणारे. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेतही मी हे म्हटले होते. माझी थट्टा करण्यात आली; पण सरकार शांत राहिले; कारण त्यालाही या प्रवृत्तींची जाणीव होती, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी लाल किल्ल्याजवळील बाँबस्फोटानंतर केले.

कोणते वातावरण भारतीय नागरिकांना आतंकवादाकडे ढकलते ?

चिदंबरम् यांनी पुढे असेही म्हटले की,

आपण विचार केला पाहिजे की, कोणते वातावरण भारतीय नागरिकांना आतंकवादाकडे ढकलते ? (चिदंबरम् काँग्रेसच्या राज्यात गृहमंत्री होते, तर त्यांनीच याचे कारण सांगायला हवे; मात्र त्यांच्या प्रश्नातून त्यांना असे दाखवायचे आहे की, ‘देशात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, बाबरी ढाचा पाडला गेला, यांमुळे ते आतंकवादी कारवाया करत आहेत.’ अशा मानसिकतेमुळेच काँग्रेसच्या राज्यात देशात जिहादी आतंकवाद नष्ट न होता उत्तरोत्तर वाढत गेला ! – संपादक)

चिदंबरम् यांच्या सरकारच्या काळात प्रतिदिन बाँबस्फोट होत होते ! – भाजप

या वक्तव्यावर भाजप नेते गौरव वल्लभ यांनी टीका करतांना म्हटले की,

चिदंबरम् यांना आतंकवादाचे विशेष ज्ञान असावे; कारण त्यांच्या काळात देशात जवळजवळ प्रतिदिन कुठेतरी स्फोट होत असत. सध्याचे सरकार आणि देशातील लोक आतंकवादाला केवळ आतंकवाद म्हणूनच पहातात. त्याचे प्रकार शोधत बसत नाहीत. आताचे सरकार आतंकवादाला कठोर उत्तर देते. अशांच्या कृत्यांना न्यायालयीन प्रक्रियेनुसार शिक्षा मिळणारच. आताचे सरकार पूर्वीच्या सरकारसारखे नाही, ज्या काळात ३ सहस्र किलो स्फोटके देशात कधी आली ? आणि कधी वापरली गेली ? हेही कळत नव्हते. सध्याच्या सरकारने सावधानतेने कारवाई करत स्फोटके जप्त केली आणि या दबावामुळेच आतंकवादी लाल किल्ल्याजवळील स्फोटासारख्या घटना करण्याकडे वळले.

संपादकीय भूमिका

भारतात दोन नाही, तर एकाच प्रकारचा आतंकवाद असून तो म्हणजे जिहादी आतंकवाद ! ते करणारे भारतीय आणि पाकिस्तानी मुसलमान असतात, हे प्रत्येक वेळी उघड झालेले आहे. भारतातील मुसलमानांना पाककडूनच कारवाया करण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य केले जाते, असे असतांना चिदंबरम् अशा प्रकारचे विधान करून पाकला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहेत !