Jaipur Dialogues Shatrubodh : आपले शत्रू आपल्या विचारविश्वातच लपलेले आहेत ! – खासदार मीनाक्षी जैन

३ दिवसांच्या ‘जयपूर डायलॉग २०२५’ला प्रारंभ !

जयपूर (राजस्थान) : आपले शत्रू बाहेर नाहीत, हे समजून घेणे आवश्यक आहे. स्वतंत्रतेपूर्व काळात इतिहासकारांनी सत्य न लपवता इतिहास लिहिला; परंतु स्वातंत्र्यानंतर मार्क्सवादी प्रभावाखाली इतिहास विकृत करण्यात आला. खरी परंपरा आणि सांस्कृतिक दृष्टी हटवून नवी विकृती रचली गेली. देहली, जेएनयू आणि अलीगड यांसारख्या विद्यापिठांच्या अभ्यासक्रमांतून मूळ भारतीय इतिहासच नाहीसा झाला. त्यामुळे आज आपल्याला समजून घ्यावे लागेल की आपले शत्रू आपल्या विचारविश्वातच लपलेले आहेत, असे विचार प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि राज्यसभेच्या खासदार (राष्ट्रपती नियुक्त) मीनाक्षी जैन यांनी येथे केले. ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध ‘जयपूर डायलॉग २०२५’च्या संमेलनात शत्रुबोध’ विषयावरील सत्रात खासदार जैन बोलत होत्या.

प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि राज्यसभेच्या खासदार मीनाक्षी जैन

खासदार मीनाक्षी जैन यांनी दीपप्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन केले. पहिल्या दिवशी मुख्य सभागृहासह विविध ठिकाणी १४ सत्रे आयोजित झाली. जयपूर डायलॉगचे अध्यक्ष संजय दीक्षित यांच्या ऑल रिलिजन आर नॉट सेम’ या इंग्रजी पुस्तकाच्या ‘सभी धर्म समान नहीं’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

‘सभी धर्म समान नहीं’ या पुस्तकाचे प्रकाशन करतांना मान्यवर

प्रथम सत्र : संस्कृतीच्या शत्रूंची ओळख

‘भारताने आपल्या संस्कृतीच्या शत्रूंना ओळखले पाहिजे’ या विषयावर पत्रकार भाऊ तोरसेकर, अनुपम मिश्रा, ओमकार चौधरी, अभिषेक तिवारी आणि बाबा रामदास यांनी चर्चा केली. वक्त्यांनी सांगितले की भारताच्या विकासाला अडथळा आणणारे अनेक खोटे कथानक (नॅरेटिव्ह) रचले जात आहेत आणि त्यांचा भांडाफोड करणे हीच खरी देशसेवा आहे.

दुसरे सत्र : दक्षिण आशियातील राजकीय घडामोडी

या सत्रात बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका देशांतील नव्या राजकीय हालचालींवर चर्चा झाली. वक्त्यांनी सांगितले की ‘जेन -झेड’ (वर्ष १९९६ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी) पिढीतील असंतोष आणि त्याचा भारतातील काही राजकीय गटांकडून होत असलेला वापर ही एक चेतावणी आहे. आपल्याला आंतरिक शत्रूंविषयी जागरूक रहावे लागेल.

तिसरे सत्र : शिक्षणाद्वारे होत असलेली भारतविरोधी घुसखोरी

खासगी संस्थांच्या निधीतून चालणार्‍या विचारसंस्थांकडून शिक्षणाच्या माध्यमातून पसरवल्या जाणार्‍या भारतविरोधी कल्पनांवर खासदार मीनाक्षी जैन, एस्थर धनराज, प्रा. भारत गुप्त, आभास मालदहियार, नीलेश ओक आणि कुंदन सिंह यांनी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, शिक्षणक्षेत्रात चालणार्‍या परकीय विचारसरणीच्या मोहिमांना ओळखणे आणि त्यांना उत्तर देणे हे राष्ट्रीय दायित्व आहे.

चौथे सत्र : देशातील अंतर्गत शत्रूंचा शोध

‘ब्रेकिंग इंडिया’ गट, ‘टुकडे टुकडे’ प्रवृत्ती, नक्षली आणि इस्लामी जाळे यांवर संजय दीक्षित, नाजिया खान, अभिजीत मित्रा, अभिजीत चावडा, पंकज सक्सेना आणि अविनाश धर्माधिकारी यांनी भाष्य केले. त्यांनी उघडपणे सांगितले की, देशविरोधी जाळे केवळ बाहेरून नाही, तर प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही रुजले आहे.

भ्रष्टाचार आणि प्रशासन यांवर चर्चा

‘ओपन माइक’ सत्रात अविनाश धर्माधिकारी, उदय माहुरकर, सॅवियो रॉड्रिग्स, राहुल सूर आणि संजय दीक्षित यांनी सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, भ्रष्टाचार हा आपल्या समाजाचा आणि लोकशाहीचा कर्करोग आहे. त्यावर उपाय शिक्षण आणि चारित्र्यनिर्माण यांतूनच शक्य आहे. शासनयंत्रणेत ‘राष्ट्र प्रथम’ची भावना रुजवण्यासाठी शिक्षणधोरण आखणार्‍या अधिकार्‍यांचा स्वभाव दृढ असणे आवश्यक आहे.

नागरिक संस्कारांचा अभाव

अभिजित अय्यर मित्रा, सुशांत सरीन आणि गर्वित यांनी चर्चेत सांगितले कील भारतात नागरिक शिस्त (सिव्हिक सेन्स) अजूनही अल्प आहे. तो ना सामान्य नागरिकांमध्ये आहे, ना जनप्रतिनिधींमध्ये आहे.  लालबत्ती (सिग्नल) ओलांडणे, रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या सवयींमुळे समाज त्रस्त होतो. समाजाचे नैतिक अध:पतन झाले आहे. तथाकथित उच्च शिक्षित लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देवतांविषयी अशोभनीय बोलतात; पण इतर धर्मांविषयी बोलायलाही धजावत नाहीत. विद्यार्थीदशेत काही लोक शौचालयांवर, ऐतिहासिक ठिकाणांवर अश्लील गोष्टी लिहितात. ही त्यांच्या दुर्बल मानसिकतेची ओळख आहे.

आपण कालक्रम समजून घ्यायला हवा !

पुढच्या सत्रात वेदवीर आर्य, नीलेश ओक आणि संजय दीक्षित यांनी वैदिक गणनेवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, गेल्या २-३ शतकांत आपल्या परंपरेचे विकृतीकरण करण्यात आले आहे. वेद आणि महाभारत यांतील खगोलज्ञान हे सत्य आणि विज्ञाननिष्ठ आहे. जगातील कोणत्याही संस्कृतीत नक्षत्र गणना नाही, ही भारताची वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे. संस्कृत श्लोकांतून ग्रंथांच्या कालगणनेचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण मिळते.

सनातन आणि सामाजिक माध्यम यांचा प्रभाव

या सत्रात कार्तिक गौर, विनोद कुमार आणि अनुज भारद्वाज यांनी चर्चा केली. त्यांनी सांगितले की ‘बटोगे तो कटोगे’ (विभागला गेला, तर मारले जाल) हा नारा भारतात अजून शेकडो वर्षे ऐकू येऊ शकतो. सामाजिक माध्यमे, चित्रपट निर्माते, यू ट्यूबर (यू ट्यूब चॅनेल चालवणारा) आणि प्रभावशाली व्यक्ती यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले की काहीजण स्वतःला हिंदुत्वाचे प्रतिनिधी म्हणवतात; पण ते प्रत्यक्षात हिंदुत्वापासून दूर आहेत. हिंदुत्व हे ख्रिस्ती आणि इस्लामी मतांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. कथित पत्रकार आणि इतिहासकारही या चुकीच्या प्रवाहात सहभागी झाले आहेत. काही लोक ज्योतिषाच्या माध्यमातून हिंदुत्वाची अपकीर्ती करतात, लोकप्रियतेसाठी इतिहास आणि अध्यात्म यांची चुकीची व्याख्या करतात.

वक्त्यांनी म्हटले की आंतरिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याचा उपयोग लोकशाहीला लाभ देतो कि हानी ?, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

युवा पिढीवर सामाजिक माध्यमाचा परिणाम

शेवटच्या सत्रात प्रियांक कानूनगो आणि हर्ष यांनी चर्चा केली. त्यांनी सांगितले की काही परकीय शक्ती सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून ‘लिव्ह-इन रिलेशन’ (विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे) आणि अश्लीलतेची सवय लावून भारतीय तरुणाईला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील तरुणांचे सरासरी वय २९ असून देशात ९० कोटींची युवा लोकसंख्या आहे. त्यामुळे भारतीय विचारसरणीवर आधारित स्वदेशी सामाजिक माध्यमांची निर्मिती ही काळाची आवश्यकता आहे.