Pakistan North Korea : पाकिस्तान उत्तर कोरियात उघडणार दूतावास : भारतासाठी अणू धोका !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

इस्लामाबाद – पाकिस्तान सरकार अण्वस्त्रधारी उत्तर कोरियात त्याचा दूतावास पुन्हा चालू करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी नुकताच दावा केला आहे की, पाकिस्तान अणूबाँब चाचण्या करत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे. पाकिस्तान सरकारचा हा प्रयत्न भारतासह संपूर्ण जगासाठी अणू तणाव वाढवू शकतो. भारत सातत्याने उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्यातील संशयास्पद अणू अन् क्षेपणास्त्र संबंधांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न उपस्थित करत आला आहे, तसेच यावर कारवाईची मागणी करत आहे.

१. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पुष्टी केली आहे की, उत्तर कोरियाने दूतावास पुन्हा चालू करण्याविषयी विनंती केली आहे. पाकिस्तान हा त्या देशांपैकी एक असल्याचे म्हटले जाते, जे रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्याशी भूमिगत अणूचाचण्या करत आहेत.

२. भारताने अनेकदा पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांच्यामधील अणू सहकार्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. वर्ष २०१७ मध्ये भारताने उत्तर कोरियाच्या अणूप्रसार जाळ्याची चौकशी करण्याची औपचारिक मागणी केली होती. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेस सांगितले होते की, दक्षिण आशियात उत्तर कोरियाकडून चालणार्‍या अणू आणि क्षेपणास्त्र प्रसाराच्या हालचालींचे अन्वेषण करणे आवश्यक आहे; कारण या कृती भारताच्या सुरक्षेवर आणि प्रादेशिक शांततेवर गंभीर परिणाम घडवू शकतात.

३. उत्तर कोरियाने पाकिस्तानला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवले आहे, तर पाकिस्तानने उत्तर कोरियाला अणू तंत्रज्ञान पुरवले आहे, असे म्हटले जाते.