राजकारण हा कौटुंबिक व्यवसाय बनला आहे ! – Shashi Tharoor

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची घराणेशाहीवर टीका

काँग्रेसचे खासदार शशी थरूर

नवी देहली – भारतातील राजकारण आता कौटुंबिक व्यवसाय बनला आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’ नावाच्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनात लिहिलेल्या लेखात केली. ‘जोपर्यंत राजकारण कुटुंबांभोवती फिरत राहील, तोपर्यंत लोकशाहीचा खरा उद्देश कधीही यशस्वी होणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

थरूर पुढे म्हणाले,

१. भारताने घराणेशाही सोडून गुणवत्तेवर आधारित व्यवस्था स्वीकारण्याची वेळ आली आहे. यासाठी कायदेशीररित्या निश्चित केलेल्या पदांच्या अटी, पक्षांतर्गत निवडणुका, मतदार जागरूकता यांसारख्या मूलभूत सुधारणांची आवश्यकता आहे.

२. गांधी-नेहरू कुटुंबाचा वारसा स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला आहे; परंतु यामुळे ‘राजकारण हा काही कुटुंबांचा जन्मसिद्ध अधिकार आहे’, अशी धारणा निर्माण झाली.

३. जम्मू-काश्मीरमधील अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंब यांनीही पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगली आहे.

४. यासह या लेखात थरूर यांनी ओडिशात नवीन पटनाईक, महाराष्ट्रात उद्धव आणि आदित्य ठाकरे, उत्तरप्रदेशात मुलायम सिंह आणि अखिलेश यादव, बिहारमध्ये रामविलास आणि चिराग पासवान, पंजाबमध्ये प्रकाश सिंह आणि सुखबीर बादल, तेलंगाणामध्ये के.सी.आर्. यांचे पुत्र आणि कन्या, तसेच तमिळनाडूमध्ये करुणानिधी आणि त्यांचेा पुत्र एम्.के. स्टॅलिन यांच्या कुटुंबातील उत्तराधिकाराच्या लढाईचा उल्लेख केला आहे.

थरूर यांचे म्हणणे अगदी योग्य ! – भाजप

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, थरूर यांनी फारच अंतर्मनापासून लिखाण केले आहे. त्यांचे ‘गांधी कुटुंबाने भारतीय राजकारणाला कौटुंबिक व्यवसायात रूपांतरित केले’, हे म्हणणे अगदी योग्यच आहे. थरूर आता जोखीम घेणारे नेते बनले असून ते त्यांच्याच पक्षातील घराणेशाहीचा वारसा चालवणार्‍या राहुल गांधी यांच्यावर थेट शाब्दिक आक्रमण करतात.

संपादकीय भूमिका

घराणेशाहीच्या राजकारणामुळेच देशाचा कधी खर्‍या अर्थाने उत्कर्ष झाला नाही, उलट सर्व क्षेत्रांत अपरिमित हानीच झाली आहे. हे चित्र पालटण्यासाठी लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रच हवे !