जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांचे ३ नोव्हेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण !

कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध !

जैन मुनी नीलेश चंद्र विजय

मुंबई – येथील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली येत्या ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुनी नीलेश चंद्र विजय यांनी १ नोव्हेंबरपासून उपोषण चालू करणार असल्याची घोषणा केली होती; मात्र मुंबई पोलिसांनी आंदोलनाला अनुमती नाकारली. त्यामुळे ३ नोव्हेंबरपासून आंदोलन करण्यात येईल.

दादर येथील कबुतरखाना

१ नोव्हेंबर हा सुटीचा दिवस असल्याने कायदा-सुव्यवस्था राखणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते, तसेच याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी यांनीही मतदारसूची दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या राजकीय पक्षांचे मोर्चे आणि जैन समाजाचे आंदोलन यांमुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून ही अनुमती नाकारण्यात आली.

जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या मागण्या !

१. कबुतरांना दाणे घालणे, ही जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वाशी जोडलेली आणि धार्मिक श्रद्धेचा भाग असलेली परंपरा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद झाल्याने अनेक कबुतरे दगावली आहेत. त्यामुळे कबुतरांचे रक्षण करायला हवे.

२. मुंबईतील जैन मंदिरांची सुरक्षा ठेवायला हवी, तसेच त्यांचे संरक्षणही करायला हवे.

३. गोरक्षण झाले पाहिजे.

४. जैन प्रार्थनास्थळे, कबुतरखाने आणि गोवंशीय यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करावा.