नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव द्या !

कोकणचे सुपुत्र आणि ‘स्वाध्याय परिवारा’चे प्रवर्तक, तसेच जगन्मान्य तत्त्वज्ञानी प.पू. पांडुरंगशास्त्री (दादाजी) आठवले यांनी संस्थेच्या माध्यमातून देश अन् विदेशात पुष्कळ मोठे आध्यात्मिक, तसेच सांस्कृतिक कार्य उभे केले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’, तर आशिया खंडातील ‘नोबेल’ पुरस्कार मानला जाणारा ‘मॅगसेसे पुरस्कार’, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ‘टेम्पलटन पुरस्कार’ यांनी सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्येही त्यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या प्रकल्पांना नावे देतांना, देश-विदेशात नावलौकिक मिळवलेल्या अशा सन्माननीय व्यक्तींचा नेहमीच विचार केला जातो, तेव्हा ‘नवी मुंबई येथील नुकत्याच उद्घाटन केलेल्या विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव देण्यात यावे’, अशी स्वाध्याय परिवाराची भावना आहे.

ज्या ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळे’मधून प.पू. दादाजींनी स्वाध्याय महामंत्राचा उद्घोष केला, त्या पाठशाळेने या वर्षीच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. केंद्र सरकारने हा सुवर्णयोग साधून नवी मुंबई विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव देऊन उचित सन्मान करता येईल. यासह स्थानिक लोकांच्या मागणीप्रमाणे विमानतळाच्या प्रवेशद्वाराला ‘लोकनेते दि.बा. पाटील प्रवेशद्वार’, असे नाव देता येईल.

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व).