नवरात्रीनिमित्त नेरूळ (नवी मुंबई) आणि विरार (पालघर) येथे शौर्य प्रशिक्षण शिबीर पार पडले !

विरार येथील शिबिरातील शिबिरार्थी

नवी मुंबईनेरूळ पश्चिमेच्या सारसोळे येथील श्री गणेश शिव मंदिर येथे नवरात्रीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शौर्य प्रशिक्षण शिबीर’ पार पडले. ६ दिवस रात्री ७.३० ते ९.०० या वेळेत आयोजित या शिबिरात ३० शिबिरार्थी सहभागी झाले होते. असेच दुसरे शिबीर विरार पूर्व नाना-नानी पार्क येथील आई भवानी नवरात्री उत्सव मंडळ, मनवेल पाडा येथे पार पडले. येथे १० दिवस रात्री ८ ते ९.३० या वेळेत झालेल्या या शिबिरात १६ शिबिरार्थी सहभागी झाले होते. धर्मप्रेमी श्री. रोशन शिगवण यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

आपल्या मंडळातून धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी काहीतरी करायला हवे, असे मागच्या वर्षीपासून वाटत होते. तशी देवीला प्रार्थनाही केली होती आणि या वर्षी समितीच्या माध्यमातून युवक-युवतींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबीर झाले. यातच देवीची कृपा अनुभवली. प्रत्यक्ष प्रशिक्षण करत असतांना देवतांना प्रार्थना केल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आणि ऊर्जा अनुभवायला मिळाली. यापुढे मी नियमित देवांना प्रार्थना करत जाईन.

– श्री. रोशन शिगवण, अध्यक्ष, अखिल मित्र मंडळ, विरार


अनेकदा समाजात इतरांना शिवकालीन शस्त्र शिकत असतांना पाहिले होते. मला हे शिकायची इच्छा होती. शिबिराच्या माध्यमातून ती पूर्ण झाली. समाजात प्रत्येक हिंदूने अशा प्रकारे प्रशिक्षित होणे आवश्यक आहे, हे शिबिरातून लक्षात आले.

– श्री. नरेंद्र चिंदरकर


नेरूळ येथील शिबिरातील शिबिरार्थी

राष्ट्र-धर्म यांवरील जिहादी समस्यांना रोखण्यासाठी शौर्याची उपासना आवश्यक ! – बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘शौर्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही’, असे महाभारतात सांगितले आहे. शौर्याच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती, समाज आणि राष्ट्र सुरक्षित ठेवू शकतो. आज आपले राष्ट्र आणि समाजावर लव्ह जिहाद, लँण्ड जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतर अशी अनेक जिहादी संकटे थोपली आहेत. पर्यायाने आपल्या प्रत्येकावरच ही संकटे आहेत. म्हणून या समस्यांना रोखण्यासाठी प्रत्येक युवा मुला-मुलींनी शौर्याची उपासना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी केले. नवी मुंबईतील नेरूळ आणि पालघरमधील विरार येथे आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या सांगता वर्गात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारतीय हे पूर्वीपासूनच शौर्याचे उपासक आहेत; मात्र इंग्रजांच्या कायद्यांनी भारतियांच्या हातातील शस्त्रे आणि गांधीच्या अहिंसेच्या संदर्भातील श्लोकाच्या अर्धवट शिकवणीने मनातील शौर्याची भावनाच नष्ट केली. त्यामुळे आपला समाज शौर्यहीन झाला आणि विविध संकटांनी आपल्याला आज घेरले आहे. तरीही आपण शक्तीचे अर्थात् दुर्गेचे उपासक आहोत. देवीच्या हातातील विविध शस्त्रे आपल्याला शौर्याची प्रेरणा देतात. त्यामुळे राष्ट्र-धर्म आणि स्वतःच्या रक्षणासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे.

या शिबिरात युवकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये लाठी, दंडसाखळी आणि कराटे यांचा समावेश होता. तसेच स्वरक्षणाचे काही तंत्र शिकवण्यात आले. यामध्ये प्रशिक्षकांनी तात्त्विक मार्गदर्शन करून युवकांचे मनोबल वाढवले. त्यामुळे स्वरक्षणाचे महत्त्व आणि आताच्या काळात त्याची अनिवार्यता लक्षात आली. शिबिराच्या समारोपाच्या वेळी सहभागी शिबिरार्थींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा नियमित सराव करण्याचा निर्धार केला.