POK Protest : पाकव्याप्त काश्मीर – आंदोलकांच्या २१ मागण्या मान्य केल्यानंतर हिंसाचार थांबला !

पाक सरकार जनतेला वीजव्यवस्था, आरोग्य सुविधा, चांगले शिक्षण आदी पुरवणार !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक सरकार आणि ‘जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती’ यांच्यात अंतत: करार झाला. यानंतर गेले ५ दिवस धुमसत असलेले पाकव्याप्त काश्मीर शांत झाले आहे. समितीच्या ३८ पैकी २१ मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर हिंसाचार थांबला. या हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले.

मान्य केलेल्या प्रमुख मागण्या !

आंदोलनामुळे होत असलेला हिंसाचार पाहुन पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाला पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे पाठवले. या शिष्टमंडळाने आंदोलकांच्या २१ मागण्या मान्य केल्या. त्यांतील प्रमुख मागण्या अशा पुढीलप्रमाणे

१. शिक्षण सुधारण्यासाठी शाळा मंडळे निर्माण केली जातील.

२. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘सिटी स्कॅन’ ही यंत्रे बसवली जातील.

३. वीजव्यवस्था सुधारण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरला १० अब्ज पाकिस्तानी रुपये दिले जातील.

. नीलम खोर्‍यात २ नवे बोगदे उभारण्यासाठीचा अभ्यास चालू करण्यात येईल.

५. मीरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याची योजना आखली जाईल.

संपादकीय भूमिका

भुकेकंगाल झालेला आणि तरीही भारतद्वेषापायी संरक्षणव्यवस्थेवर पाण्यासारखा पैसा खर्च करणारा पाक, म्हणे पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पायाभूत सुविधा देणार. प्रत्यक्षात पाकने तेथील जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. पाकिस्तान दिलेले आश्वासन कधीही पूर्ण करणार नाही आणि येथून पुढच्या काळात पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी आंदोलने होतील, ही वस्तूस्थिती आहे !