‘सेनारी हत्याकांड’ : बिहारच्या इतिहासातील एक काळी रात्र !

१८ मार्च १९९९ या दिवशी राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या नेत्या राबडीदेवी दुसर्‍यांदा बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्याच दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सध्याच्या अरवल जिल्ह्यातील सेनारी गावात (तेव्हाच्या जहानाबाद जिल्ह्यात) ५०० नक्षलवाद्यांचा एक गट बाँब आणि बंदुका घेऊन गावात शिरला. गावापासून २ किलोमीटरवर असलेल्या सहरसा गावात एक पोलीस चौकी होती. त्या चौकीत केवळ ६ पोलीस कर्मचारी होते. नक्षलवाद्यांनी त्या चौकीवर आक्रमण करून ताबा मिळवला. जवळपास २०० नक्षलवादी चौकी ताब्यात ठेवून होते आणि उरलेले ३०० नक्षलवादी सेनारी गावाकडे निघाले.

नक्षलवाद्यांचे संग्रहित छायाचित्र

१. नक्षलवाद्यांनी सेनारी गावात केलेले क्रौर्य आणि गावाची ‘विधवांचे गाव’ म्हणून ओळख !

सेनारी गावात पोचल्यावर नक्षलवाद्यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी झिंदाबाद’, ‘माओवाद झिंदाबाद’ आणि ‘लालूप्रसाद झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. त्यांनी भूमीहार समाजातील शेतकर्‍यांच्या घरांवर आक्रमणे केली. ‘डायनामाईट’चा (स्फोटकांचा) वापर करून घरांच्या भिंती उडवल्या. त्यांनी ५० हून अधिक भूमीहार शेतकर्‍यांची निर्घृण हत्या केली. सगळ्यांना एका रांगेत बांधून एकेकाचा गळा कापण्यात आला. महिलांचीही अब्रू लुटली गेली आणि त्यांच्या खासगी अवयवांवर बंदुकीने, तसेच चाकूने वार करण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत नक्षलवाद्यांनी गावात हाहाःकार माजवला. ‘लालूप्रसाद झिंदाबाद’, ‘लाल सलाम’, ‘कम्युनिस्ट पार्टी झिंदाबाद’ आणि ‘भूमीहार मुर्दाबाद’, अशा घोषणा ते देत होते.

नक्षलवादी निघून गेल्यावर पहाटे ३ वाजता पोलीस ठाकूरवाडी येथे पोचले. पोलिसांनी विजेरी लावून पाहिल्यावर सर्वत्र मृतदेहच मृतदेह पडले होते. लोकांच्या गळ्यातून रक्ताचे फवारे उडत होते आणि आतडी बाहेर आली होती, जणू काही तो कत्तलखाना होता. या घटनेनंतर सेनारी गावाला ‘विधवांचे गाव’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

१९ मार्च या दिवशी पाटणा उच्च न्यायालयाचे तत्कालीन निबंधक पद्मनारायण त्यांच्या सेनारी गावी पोचले. आपल्या कुटुंबातील ८ मृतदेह पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावकरी आणखी संतापले. तो क्षण पहाणार्‍या प्रत्येकासाठी पुष्कळ भयानक होता.

२. राष्ट्रपती राजवट मागे घेतल्यानंतर घडलेले सेनारी हत्याकांड

त्या वेळी केंद्रात भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. सरकारमधील मंत्री सेनारी गावात पोचले. याआधी जानेवारीमध्ये शंकर बिगहा आणि फेब्रुवारीमध्ये नारायणपूर येथे झालेल्या हत्याकांडानंतर अटल सरकारने राबडी सरकार बरखास्त केले होते; पण राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे ८ मार्च या दिवशी राष्ट्रपती राजवट मागे घ्यावी लागली; कारण काँग्रेसने लालूप्रसाद यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. ९ मार्च या दिवशी राबडीदेवी पुन्हा मुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर ९ दिवसांनी हे सेनारी हत्याकांड घडले. या भयंकर घटनेनंतर भाजपने राबडीदेवींच्या त्यागपत्राची मागणी केली.

अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला उद्देशून भाषण करतांना म्हटले की, ‘या नरसंहाराला काँग्रेस उत्तरदायी आहे; कारण त्यांनी अशा पक्षाला (राष्ट्रीय जनता दलाला) पाठिंबा दिला, जो अशा हत्याकांडासाठी कारणीभूत आहे’; कारण त्या वेळी काँग्रेस बिहारमधील राबडीदेवी यांच्या सरकारमध्ये सामील झाली होती.

३. राज्यपालांच्या आदेशानुसार गावकर्‍यांना संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने देण्यात येणे

गावकर्‍यांनी जेव्हा मुख्यमंत्री राबडीदेवींना साहाय्याची आणि गावात येण्याची विनंती केली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘जे लोक मेले ते माझे मतदार नाहीत, मग मी तिथे का जाऊ ?’ यानंतर वाजपेयी सरकारच्या आदेशानुसार बिहारचे राज्यपाल बी.एम्. लाल सेनारी गावात पोचले. गावकर्‍यांनी त्यांच्याकडे बंदुकीची मागणी केली. त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘राज्य सरकारच्या सुरक्षेवर आमचा विश्वास नाही.’ पाटणाला परतल्यावर राज्यपालांनी आदेश काढला, ज्यानुसार गावकर्‍यांना बंदुकीचे परवाने (गन लायसन्स) देण्यात आले.

४. सेनारी हत्याकांडात काँग्रेस ही रक्तपाताची खरी भागीदार !

सेनारी हत्याकांड केवळ एका गावाचा किंवा एका समाजाचा प्रश्न नव्हता, तर संपूर्ण लोकशाहीवरचा प्रहार होता; पण या नरसंहाराला उत्तरदायी केवळ नक्षलवादी नव्हते, तर त्यांना पाठीशी घालणारे, मतांसाठी गुन्हेगारांना संरक्षण देणारे सत्ताधारीही तितकेच दोषी होते. लालू-राबडीदेवींच्या राजवटीला कृत्रिम श्वास देणारी काँग्रेस या रक्तपाताची खरी भागीदार आहे; कारण बहुमत वाचवण्यासाठी त्यांनी बिहारच्या भूमीत निरपराधांचा नरसंहार होऊ दिला. आज जेव्हा काँग्रेस स्वतःला लोकशाहीची रक्षक म्हणवते, तेव्हा सेनारीच्या विधवा स्त्रिया, अनाथ मुले आणि कापून ठार मारलेले शेतकरी यांच्या सावल्या त्यांना नेहमी प्रश्न विचारते, ‘लोकशाही वाचवली कि खुनी राजकारणाला जन्म दिला ?’

– जयसिंग मोहन, पुणे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसने लोकशाही वाचवली कि खुनी राजकारणाला जन्म दिला ?