पाकव्याप्त काश्मीर आपोआप आमचे होईल, आम्हाला आक्रमण करण्याची आवश्यकता नाही ! – Rajnath Singh

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा !

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

रबात (मोरोक्को) – पाकव्याप्त काश्मीर आपोआप आमचे होईल. तेथे मागण्या वाढू लागल्या आहेत; तुम्ही घोषणा ऐकल्या असतील. ५ वर्षांपूर्वी जेव्हा मी काश्मीर खोर्‍यातील एका कार्यक्रमात भारतीय सैन्याला संबोधित करत होतो, तेव्हा मी म्हटले होते की, आम्हाला पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून त्याला कह्यात घेण्याची आवश्यकता नाही. ते आमचे आहे.

पाकव्याप्त काश्मीर स्वतः म्हणेल, ‘मीही भारत आहे.’ तो दिवस येईल, असा दावा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. त्यांनी आफ्रिका खंडातील मोरोक्को देशाच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर असतांना हे विधान केले. त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स’च्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन करणे हा होता, जो आफ्रिकेतील भारताचा पहिले संरक्षण उत्पादन युनिट आहे.