(म्हणे) ‘जाती-धर्मांमध्ये वैर पसरवणार्‍यांना आता आई चामुंडेश्वरी चांगली बुद्धी देवो !’ – Siddaramaiah

  • कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पोस्ट

  • हिंदुद्वेषी लेखिका बानू  मुश्ताक यांना दसरा उत्सावाला बोलावल्याच्या प्रकरणी केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केले विधान

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक

बेंगळुरु (कर्नाटक) – मैसुरु दसरा महोत्सवाच्या उद्घटनासाठी ‘बुकर’ पुरस्कार विजेत्या तथा हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांना निमंत्रित केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘या निर्णयाचे मी स्वागत करतो. मैसूरु दसरा, हा केवळ धार्मिक सण नाही. ‘जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व लोक हा सण एकत्रितपणे साजरा करतात’, असे आम्ही आधीपासूनच सांगत आलो आहोत. तरीही काही लोकांनी याविरोधात चुकीचा प्रचार करून समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आमच्या सरकारची भूमिका योग्य ठरली आहे, असे मला वाटते. ‘जाती-धर्मांमध्ये वैर पसरवणार्‍या विघातक विचारांना आता आई चामुंडेश्वरी चांगली बुद्धी देवो’, अशी आशा करतो.’

सामाजिक माध्यमांत लोकांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया

१. एका व्यक्तीने लिहिले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करणे पुरेसे नाही. आता तुम्ही एखाद्या मुसलमान किंवा ख्रिस्ती सणाचे उद्घाटन हिंदूंकडे देऊन तुमची धर्मनिरपेक्षता सिद्ध करा, मग आम्ही तुमचे हे धडे मान्य करू.

२. दुसर्‍याने लिहिले की, तुम्ही काहीही म्हटले, तरी मैसुरु दसरा हा हिंदु पंचांगानुसारच साजरा होतो. विजयादशमी हा दिवस श्री चामुंडीदेवीचा विजय म्हणून साजरी केला जातो.

३. एका व्यक्तीने म्हटले आहे की, देशाच्या इतिहासातील सर्वांत वाईट मुख्यमंत्र्यांपैकी एक. आपल्या पारंपरिक सणाचे उद्घाटन दुसर्‍या धर्मातील व्यक्तीकडून होत आहे, हे स्वीकारणे कठीण आहे.

४. मैसुरु परिसरात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत (मडिकेरी, विराजपेट, पेरियापटना, हुणसुर, चामुंडेश्वरी, कृष्णराज, चामराज आणि नरसिंहा) त्यांपैकी काँग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत. येथील हिंदूंनी फुकट योजनांना मत दिल्याची ही योग्य शिक्षा आहे, असे एकाने म्हटले आहे.

५. जर तुमच्या बाजूने निकाल आला, तर ‘न्यायव्यवस्था योग्य आहे’ आणि जर विरोधात निकाल आला, तर ‘न्यायव्यवस्था मोदींच्या नियंत्रणात आहे’, असे तुम्ही ओरडत रहाता.

संपादकीय भूमिका

मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंशी कायम भेदभावाने वागणारी काँग्रेस खर्‍या अर्थाने जाती-धर्मांमध्ये वैर पसरवत आहे. अशी काँग्रेस आता सुधारण्याच्या पलीकडची असल्याने तिचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे, यातच समाजहित आहे !