हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांचा ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’ करणार श्राद्धविधी !

हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेले मावळे

मुंबई, १८ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढतांना धारातीर्थ पडलेले मावळे, देशाच्या रक्षणासाठी बलीदान देणारे सैनिक आणि जनतेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले पोलीस यांचा श्राद्धविधी ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’कडून केला जाणार आहे. २० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीच्या जवळ हा श्राद्धविधी होणार आहे, अशी माहिती ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’चे पदाधिकारी श्री. राम धुरी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

मागील २४ वर्षांपासून प्रतिष्ठानकडून श्राद्धविधी करण्यात येत आहे. पूर्वी हा श्राद्धविधी किल्ले रायगडावर करण्यात येत होता; मात्र वर्ष २०२२ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या विकृत कार्यकर्त्यांनी महाड पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी रायगडावर श्राद्धविधी करण्यास विरोध केला. तेव्हापासून श्राद्धविधी पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीजवळ करण्यात येतो, अशी माहिती श्री. राम धुरी यांनी दिली. या श्राद्धविधीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे, रोजगार हमी योजनामंत्री भरतशेठ गोगावले, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आदींना निमंत्रण देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.