Ashtavinayak Land Scam : अष्टविनायकांपैकी एका असणार्‍या रांजणगाव (पुणे) येथील महागणपति देवस्थानाची ६५ एकर भूमी ७/१२ वरून गायब !

देवस्थान ट्रस्टलाही या भूमीची माहिती नाही !

शिक्रापूर (जिल्हा पुणे) : अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या रांजणगाव येथील महागणपति देवस्थानाच्या नावे असलेल्या ढोक सांगवी (ता. शिरूर) येथील ६५ एकर भूमी क्षेत्र ७/१२ उतार्‍यावरून गायब झाल्याचे दिसून आले. त्याविषयी राज्याचे राज्यपाल यांच्याकडे निवृत्त सैन्य अधिकारी शिवाजी असवले यांनी दाद मागितली आहे.

१. देवस्थानाच्या मालकीचे ढोक सांगवी येथील ६५ एकर क्षेत्र गायब असल्याची तक्रार शिक्रापूर येथील निवृत्त सैन्याधिकारी शिवाजी असवले यांनी मे २०२४ मध्ये शिरूर तहसील कार्यालयाकडे केली होती.

२. गेले वर्षभर पाठपुरावा केला, तरी त्यासंबंधी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अंततः राज्यपाल कार्यालयाने शिरूर तहसील कार्यालयाला सूचना केल्यानंतर कार्यवाहीस प्रारंभ झाला. (प्रकरणावर कार्यवाही करण्यास एवढा विलंब का लागला ? संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)

३. सर्व मिळकती एल्.आर्. नं. १६ नोंदवहीतील (वतन नोंदवही) नोंदीनुसार इनामवर्ग ३ नुसार रांजणगाव देवस्थानाच्या नावाने नोंदवल्या आहेत; मात्र वर्ष १९२७ मध्ये कढईपत्रक (भूमीचा हक्क दर्शवणारे कागदपत्र) होतांना आणि त्यानंतर ७/१२ नोंदी होतांना देवस्थानाचे ‘इनाम वर्ग ३’ नुसार नोंद न होता भलत्याच नावांचे ७/१२ उतारे बनवून हे सर्व क्षेत्र ‘इनाम वर्ग १’ म्हणून सध्या नोंद करण्यात आले आहेत.

४. सर्व ६५ एकर क्षेत्र हे रांजणगाव देवस्थानाच्या मालकी हक्कातून गायब झाले असून ते तात्काळ देवस्थानाला परत मिळावे, यासाठी असवले पाठपुरावा करत असल्याचे त्यांचे अधिवक्ता हर्षल गोसावी यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाई करू ! – सौ. स्वाती पाचुंदकर, अध्यक्षा, ‘रांजणगाव देवस्थान ट्रस्ट’

सौ. स्वाती पाचुंदकर, अध्यक्षा, ‘रांजणगाव देवस्थान ट्रस्ट’

‘रांजणगाव देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षा म्हणाल्या की, देवस्थानाचे ६५ एकर क्षेत्र जर गायब असेल किंवा ते देवस्थानाचे असूनही आमच्याकडे नसेल, तर त्याविषयी आम्ही माहिती घेऊ. त्यानंतर धर्मादाय उपायुक्तांकडे प्रकरण सादर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्र पुन्हा देवस्थानाला प्राप्त करून घेण्यासाठी कायदेशीर कारवाई करू.

प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले ! – तहसीलदार

शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले, ‘‘या प्रकरणाची माहिती मिळताच मंडलाधिकार्‍यांनी नेमणूक करून जुन्या कागदपत्रांची, नोंदींची पडताळणी केली. वतन नोंदवहीमध्ये तक्रारदार म्हणतात, तशा नोंदी आहेत. कढईपत्रक आणि ७/१२ मध्ये नोंदी कशा आल्या नाहीत अन् त्याचे वेगळे ७/१२ कसे बनले ? याची मािहती उपलब्ध होत नाही. हे सर्व प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेले आहे.’’

संपादकीय भूमिका

  • देवस्थानाची भूमी बळकावणे किंवा ती परस्पर इतरांच्या नावे करणे, असले प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘देवस्थानाची भूमी ही त्या संबंधित देवतेच्या मालकीची भूमी असते’, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्यामुळे असा गैरव्यवहार करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
  • मोठ्या प्रमाणात भूमी बळकावली जात असतांना ट्रस्टच्या ते लक्षात कसे आले नाही ?