भारतातील जंगली पर्वतीय भागांत अनुमाने ४२७ आदिवासी जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ सहस्र प्रजाती असून भारतीय आदिवासी १ सहस्र ५३० पेक्षा अधिक वनस्पती दैनंदिन आहारात खाण्यासाठी वापरतात. यात प्रामुख्याने १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फूलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाणांच्या आणि सुका मेव्याच्या प्रजाती आहेत. आदिवासी ऋृतूमानानुसार रानभाज्यांचा आपल्या आहारात उपयोग करत असतात.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/939125.html
(भाग ३)

१. टाकळा (कॅसिया तोरा) भाजीची माहिती
ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात सर्वत्र उगवते. पडीक किंवा ओसाड भूमी, शेत, बाग, जंगल, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. सर्व प्रकारच्या त्वचारोगामध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो.
इसब ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यांसारखे त्वचाविकारही न्यून होतात. पानांच्या भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी (जंत) नष्ट होतात. दात येणार्या मुलांना ताप येतो. अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यावर नियत्रंण करतो. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानांचा रस मधातून दिला जातो.
ही भाजी मुळात उष्ण असल्यामुळे शरिरातील वात आणि कफ दोष न्यून होण्यास साहाय्य होते. पावसाळ्यात शरिराला सुटणारी खाजही न्यून होते. अर्थातच हे सर्व तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपाय करणे अत्यावश्यक आहे.

अ. भाजी करण्याची पद्धत : भाजीसाठी फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने घ्यावीत. पाने स्वच्छ धुऊन पाणी गळून जाऊ द्यावे. कढईत तेल टाकून कांदा परतून घ्यावा. मोहरीची फोडणी द्यावी. त्यात ओली मिरची अथवा तिखट आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार घालावे. हळद टाकावी. त्यानंतर त्यावर भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली की, थोडासा गुळ आणि मीठ घालावे. किसलेले ओले खोबरे घालावे. भिजवलेली तूरडाळ किंवा आठळांचे (फणसांच्या बियांचे) बारीक तुकडे ती शिजत असतांना टाकल्यास भाजी अधिकच चविष्ट बनते. केवळ लसणाच्या पाकळ्यांमध्येही फोडणी घालून आणि हिंगाचा वापर करून ही भाजी रुचकर बनवता येते.
शहरातील नागरिकांना रानभाज्यांची नावे त्यांचे लाभ ठाऊक नसतात. बर्याच वेळा त्याची चव वेगळी असल्यामुळे या भाज्यांकडे ग्राहक पाठ फिरवत असतात. या मालिकेमुळे या भाज्यांची नवी ओळख झाली असेल. हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/940269.html
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?