वासरास बळजोरीचे दूध पाजून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणी २ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

पंढरपूर येथील गोशाळेत नवजात वासरू मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण !

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या गोशाळेत कर्मचारी योगेश सुधाकर पाठक आणि तानाजी रामचंद्र जाधव यांनी २ दिवसांच्या नवजात वासरास बळजोरीने दूध पाजले होते. यात त्या वासराचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना उत्तरदायी धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गोशाळा विभागाचे प्रमुख पांडुरंग बुरांडे यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही कर्मचार्‍यांवर भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३२५ आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक चित्र

१. नवजात वासरू दूध पित नसल्याने या कर्मचार्‍यांनी नवजात वासराची मान बळजोरीने हातात धरून ती दुधाच्या भांड्यात बुडवली आणि यानंतर काही वेळातच या वासराचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता.

२. यानंतर संबंधित कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद होण्यासाठी गोरक्षकांनी आंदोलन केल्यानंतरही मंदिरे समितीने प्रारंभी कोणतीच कारवाई केली नव्हती. अंततः समाजिक माध्यमांमध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर आणि ठिकठिकाणी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मंदिरे समितीने कारवाई केली.

३. मंदिरे समितीच्या आगामी सभेत सदर विषय मांडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.

४. मंदिरे समितीच्या या गोशाळेत गायींची हेळसांड झाल्याचा हा पहिला प्रकार नसून वर्ष २०१८ मध्येही गायींना चारा न मिळाल्याने त्या गायींनी गावातील उकीरड्यावरील कचरा खाल्ल्याने गायींच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य घातक पदार्थ मोठ्या प्रमाणात गेल्याने काही गायींचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता.

संपादकीय भूमिका

  • निर्दयी कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
  • अशा चुका अन्य कर्मचार्‍यांकडून न होण्यासाठी मंदिरे समितीने लक्ष घालणे आवश्यक !